लातूर : प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात प्राध्यापकानी ई-कंटेंट निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अध्यापन अधिक विद्यार्थी केंद्रित, संवादात्मक आणि परिणामकारक बनविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर येथील संगणकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा देसाई यांनी केले.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूरच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ई-कन्टेंट डेव्हल्पमेन्ट अॅण्ड एआय इन एज्युकेशन या विषयावर पाच दिवसीय अध्यापक विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डी. वाय. पाटील विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर येथील संगणकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा देसाई यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही शिक्षकांची जागा घेणारी नसून अध्यापन अधिक प्रभावी करणारी सहायक तंत्रज्ञान प्रणाली असल्याचे सांगून डॉ. देसाई म्हणाल्या की, गुणवत्तापूर्ण ई-कंटेंट तयार करण्यासाठी विविध डिजिटल साधने, एआय-आधारित प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक नवोपक्रम यांची माहिती त्यांनी सहभागी प्राध्यापकांना दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी डिजिटल कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम अध्यापनातील गुणवत्ता वाढविण्यास आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यास उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या वतीने एआय वर फक्त कला महाविद्यालयातील प्राध्यापकासाठी पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलेले महाराष्ट्रातील कदाचित एकमेव महाविद्यालय असेल अशी भावना व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे येथील नवनिर्मिती आणि अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहाय्य्क प्रीतम दरेकर यांनी प्रास्ताविक व उद्देश स्पष्ट करताना कार्यक्रमाची रूपरेषा आणि पाच दिवसांत होणा-या विविध तांत्रिक सत्रांची माहिती दिली. या प्रशिक्षणामध्ये ई-कंटेंट निर्मिती, जनरेटिव्ह एआय, अध्यापनातील एआय साधनांचा वापर, डिजिटल मूल्यांकन आणि शैक्षणिक तंत्रज्ञान या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कल्पना कदम यांनी मांडले.
















