लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमध्ये गेल्या एक ते दिड वर्षापासून ई-ऑफिस प्रणाली सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत दाखल होणा-या फाईलींचा निपटारा हा सदर प्रणालीवरच होत आहे. १ जुलै पासून सर्व पंचायत समिती स्तरावरून येणारे ऑफलाईन टपाल आता ऑनलाईन ई-ऑफीस टपालाद्वारे जिल्हा परिषदेत स्विकारले जात आहे. त्यामुळे कर्मचा-यांना जिल्हा परिषदेला फाईल घेऊन जाण्यासाठीचा वेळ वाचणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेने काळानुसार बदल स्विकारत सर्व विभागांमध्ये आता ई-ऑफिस प्रणाली लागू केली आहे. जिल्हा परिषदेत दररोज २०० च्यावर टापल, फाईली दाखल होतात. त्यासाठी विभागानुसार टपाल घेण्यासाठी कर्मचा-यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांना जून मध्ये पत्र काढून कार्यालयीन कामकाजाचा निपटारा लवकर होण्यासाठी सर्व पत्रव्यवहार ऑनलाईन व ई-ऑफीसद्वारे करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच जिल्हा परिषद स्तरावरून विभागीय आयुक्त कार्यालयास करण्यात येणारा पत्रव्यवहारही ई-ऑफीसद्वारेच करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून ई-ऑफीसद्वारेच टपाल स्विकारल्या जात आहे. गोपनिय फाईल व काही फाईलचा अपवाद वगळता सर्व फाईल ई-ऑफीसद्वारेच स्विकारल्या जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या ई-ऑफीस मधील आवक-जावक विभागाला प्रत्येक विभागाने पत्रव्यवहार करने, तसेच आवक-जावक विभागाने तो पत्रव्यवहार संबंधीत विभागाच्या आवक-जावक विभागाला करावा. पंचायत समिती स्तरावरूनही असाच पत्रव्यहार पीडीएफ स्वरूपात करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे फाईल व फाईल मधील कागदत्र गहाळ होण्याच्या प्रकरणांना आळा बसणार आहे. सदर फाईलचा प्रवास जलदगतीने होऊन कामाचा निपटारा होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषेदेत दाखल झालेल्या फाईलीवर काय कार्यवाही झाली. त्याची माहितीही ई-ऑफिस प्रणालीद्वारेच संबधित विभागाला कळविली ताणार आहे.
















