नांदेड : प्रतिनिधी
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आजपासून दुष्काळी दौ-यावर असून, या दौ-यादरम्यान ते नांदेड जिल्ह्यातील शेतपिकांची पाहणी तसेच विभागीय अधिका-यांसोबत बैठक घेणार आहेत. मात्र, कृषिमंत्री विभागीय बैठकीसाठी रवाना होत असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला.
कृषिमंत्र्यांची गाडी येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनासमोर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी कर्जमाफी झाली पाहिजे, शेतक-यांना पीकविमा मिळाला पाहिजे, अशा विविध घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कृषिमंत्र्यांना वाळलेले सोयाबीन दाखवून शेतक-यांच्या नुकसानीची माहिती देण्याचा तसेच निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी शेतक-यांना कर्जमाफी, पीकविम्याची रक्कम आणि दुष्काळी परिस्थितीत योग्य मदत मिळावी, अशी मागणी केली.
दरम्यान, कृषिमंत्री दत्ता भरणे हे पुयनी आणि मरळक येथे पिकांची पाहणी करण्यासाठी जाण्याच्या तयारीत होते. या पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या समस्या मांडण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले होते. मात्र, कृषिमंत्र्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भाग्यनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. शेतक-यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवताना पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कृषिमंत्र्यांच्या दौ-यादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत काँग्रेस कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे आपल्या नियोजित विभागीय बैठकीसाठी रवाना झाले. दरम्यान, दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान, कर्जमाफी आणि पीकविम्याचा प्रश्न यावरून आगामी काळात शेतकरी प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
















