लातूर : प्रतिनिधी
भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची जाणीव जागवण्याचे महान कार्य लोकमान्य टिळक यांनी केले. म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. लोकांना अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याची प्रेरणा त्यांनी दिली. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना टिळकांनी केली. म्हणून त्यांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयाला देशप्रेम, स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रसेवा हीच त्यांची खरी शिकवण आसल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक मैनोदीन शेख यांनी केले.
भोईसमुद्रा येथील कै. पंढरीनाथ पिचारे जागृती विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक शेख या दोन्ही महापुरुषांच्या अभिवादन प्रसंगी बोलत होते. यावेळी रविकिरण चामे, बालाजी येलाले, संतोष दळवे, शरद पवार, सुमित्रा साबळे, गणपती मुंडे, भागवत करपुडे, विष्णू घुले, ज्ञानोबा बोयणे, तानाजी सुरवसे उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही केवळ कादंबरी नसून अन्याय, गुलामी आणि शोषणाविरुद्ध उभ्या राहिलेल्या सामान्य माणसाच्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे. फकीरा हा धाडसी, स्वाभिमानी आणि न्यायप्रिय व्यक्तिमत्व आहे. तो स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर समाजातील गरीब शोषित आणि वंचित लोकांच्या हक्कासाठी संघर्ष करतो. जातीभेद, सामाजिक विषमता, दारिर्द्य आणि ब्रिटिश सत्तेच्या काळातील अन्याय याचे वास्तववादी या कादंबरीतून विवेचन केले आसल्याचे सांगून शेख म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची, स्वाभिमानाने जगण्याची आणि समाजातील दुर्बल घटकाप्रती संवेदनशील राहण्याची प्रेरणा देते.
















