नांदेड : प्रतिनिधी
मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाने होरपळत असताना, नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी आढावा बैठकीत नेत्यांमध्येच जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे. शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत नेत्यांनी काजू बदामावर ताव मारला. याबाबतचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने शेतक-यांसह सामान्य नागरिकांमधून नेत्यांविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नांदेड येथील वातानुकूलित नियोजन भवनाच्या थंडगार कक्षात आठ जिल्ह्यांसाठी ही आढावा बैठक पार पडली. मराठवाड्यातील अनेक भागांत शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई, पीकविमा, कर्जाचा प्रश्न आणि नुकसानभरपाई अशा अनेक समस्यांनी शेतकरी त्रस्त असताना, या प्रश्नांवर ठोस चर्चा होणे अपेक्षित होते. बैठकीच्या सुरुवातीला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुष्पगुच्छ आणि सत्कार स्वीकारण्यास नकार देत साधेपणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर बैठकीतील वातावरण काही वेळातच बदलले.
दुष्काळी परिस्थितीवर चर्चा सुरू असताना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. शेतक-यांच्या अडचणींवर चर्चा करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याऐवजी बैठकीत वैयक्तिक आणि राजकीय मुद्द्यांवरून वाद झाल्याचे चित्र समोर आले. या बैठकीत काही नेते आणि लोकप्रतिनिधींमध्ये काजू-बदाम तसेच इतर खाद्यपदार्थांच्या मुद्द्यावरूनही टोलेबाजी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळी आढावा बैठक नेमकी शेतक-यांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी होती की नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांसाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यावेळी ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, खासदार संजय चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री. हेमंत पाटील, अमरनाथ राजूरकर, सईद खान, कैलास पाटील, बाबूराव कदम कोहळीकर, भिमराव केराम, राजेश पाटील, राजू नवघरे, प्रताप पाटील चिखलीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, उपायुक्त रिता मैत्रेवार, वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होत्या. तर खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बजरंग सोनवणे, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह विविध विधानसभा मतदार संघातील आमदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पीक नुकसानग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी शासन कटिबद्ध : भरणे
नांदेड : मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून, पावसात खंड पडल्याने शेती पिकांवर परिणाम झाला आहे. संकटग्रस्त शेतक-यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई व मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतक-यांना मिळण्यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक व अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आयोजित बैठकीत दिले.
नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील आठही जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा कृषी मंत्री भरणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
















