मुंबई : राजधानी दिल्लीत नीट पेपरफुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट सहभाग घेत आंदोलकांना बळ दिले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांच्याशी उद्धव ठाकरे सातत्याने संपर्कात होते. तसेच, सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती देखील त्यांनी वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करत केली होती. त्यानंतर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जनंतर आता उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर त्यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर, ते सर्वच विरोधकांनी आंदोलकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका घेत आहेत.
एकीकडे अभिजीत दिपकेंचे आंदोलन तीव्र होत असताना, दुसरीकडे काँग्रेसही आक्रमक बनली असून राहुल गांधींच्या नेतृत्वात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर खासदारांनी आपला रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांनी संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनाही ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन आंदोलकांची भेट घेतली. केंद्र सरकार ज्या बेरहमीने आणि असभ्यपणाने आंदोलक तरुण आणि महिलांवर अत्याचार करत आहे, हे कोणत्याही लोकशाहीचे लक्षण नाही. आज देशात जो आक्रोश दिसतोय, तो अचानक आलेला नाही; तर हा गेल्या १२ वर्षांत साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, सरकार दखल घेत नसल्याने आता आंदोलनाचे स्वरूप बदलण्याचेही त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे सध्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा करणार आहेत. इंडिया आघाडी आणि विरोधी पक्ष एकत्र मिळून या मुलांच्या आंदोलनाच्या पाठीशी कसे राहतील यासाठी प्रत्येक विरोधी पक्षाने प्रयत्न करावा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. दिल्लीत आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेत सुद्धा उद्धव ठाकरेंनी या मुद्यावर विरोधक म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशा प्रकारची भूमिका घेतल्याचे दिसून आले.
















