छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज येथील दत्तसंप्रदायाचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने परभणीसह मराठवाडाभरातील भाविकांमधून हळहळ व्यक्त होत असून, श्रीक्षेत्र गुंज येथे शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेलेले कालिदास महाराज आपल्या सहका-यांसह गुंजकडे परत येत होते. यावेळी बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कालिदास महाराज यांच्यासह त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कालिदास महाराज यांनी गेली ४ दशके अखंड मौनव्रताचे पालन करत अध्यात्म, सेवा आणि समाजप्रबोधनाचा अनोखा मार्ग स्वीकारला होता. दत्त संप्रदायाच्या विचारांचा प्रसार करत त्यांनी राज्यभर असंख्य भक्तांना आध्यात्मिक जीवनाची दिशा दिली. व्यसनमुक्ती, सदाचार, निस्वार्थ सेवा आणि लोककल्याण यांचा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून दिल्याने त्यांच्याबद्दल समाजात विशेष आदराची भावना होती.
भाविकांवर शोककळा,
मंत्र्यांकडून श्रद्धांजली
मौनव्रत असूनही त्यांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोप-यातून भाविक श्रीक्षेत्र गुंज येथे येत असत. त्यांच्या आशीर्वादातून आणि साध्या, संयमी जीवनातून अनेकांना अध्यात्माची प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच भाविकांमध्ये दु:खाची लाट पसरली असून, सामाजिक, धार्मिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. मंत्री मेघना बोर्डीकर यांनीही महाराजांना श्रद्धांजली वाहिली.
















