मुंबई : प्रतिनिधी
मुंबईला विविध ७ धरणांमधून दररोज सुमारे ४ हजार १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात असला तरी शहराची एकूण गरज ४ हजार ६६५ दशलक्ष लिटर इतकी आहे. ही तूट भरून काढण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा २०० एमएलडी क्षमतेचा नि:क्षारीकरण प्रकल्प मनोरी येथे उभारण्यात येत असून येत्या ४ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.
समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी आज मनोरी येथील नि:क्षारीकरण प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सामंत यांनी नि:क्षारीकरण प्रकल्पामुळे मुंबईला अतिरिक्त २०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. प्रकल्प सुरू झाल्यानंतर १ हजार लिटर पाण्यासाठी सुमारे ३५ रुपये म्हणजेच प्रतिलिटर १५ ते १७ पैसे इतका खर्च अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मनोरीतील नि:क्षारीकरण प्रकल्प संयुक्त भागीदारी तत्त्वावर विकसित करण्यात येत असून यासाठी मे. जीव्हीपीआर इंजिनियर्स लिमिटेड आणि मे. आय. डी. ई. टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारी उपक्रमाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र संदर्भातील आवश्यक मान्यता प्राप्त झाली आहे, असे सामंत म्हणाले.
४ हजार ७७ कोटींचा प्रकल्प
प्रकल्पाच्या बांधकामाची किंमत ४ हजार ७७ कोटी रुपये असून त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. कार्यादेशानुसार प्रकल्पाच्या बांधकामाचा कालावधी ४८ महिने असून त्यानंतर २० वर्षांचा प्रचलन आणि परिचालन कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.















