चंबा : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला आहे. चंबा जिल्ह्यातील चुराह भागातील पुखरी-मसरुंड रस्त्यावर एका वाहनाचा ताबा सुटून ते खोल दरीत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला; यामध्ये एकाच गावातील तीन भावांचाही समावेश आहे. मृतांमध्ये पुरुष आणि महिलांचा समावेश असून, ते एका ‘मुंडन’ (केशमुंडन) समारंभातून परतत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे २ वाजण्याच्या सुमारास चंबा-मसरुंड रस्त्यावरील छतरुंडजवळ ‘बोलेरो’ गाडीचा ताबा सुटला आणि ती सुमारे ५०० मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये चालक आणि ग्रामपंचायत महाल अंतर्गत येणा-या सप्रोथ गावातील सहा रहिवासी (तीन पुरुष आणि तीन महिला) प्रवास करत होते. ते काकद्रोथा गावात एका मुंडन समारंभाला उपस्थित राहून घरी परतत होते.
छतरुंडजवळ गाडीचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरून खाली खोल दरीत कोसळली. गाडीतील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (चंबा) दिनेश कुमार यांनी सांगितले की, अथक प्रयत्नांनंतर दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंबा येथे पाठवण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.
स्थानिक आमदारांकडून दु:ख व्यक्त
चंबा जिल्ह्यातील चुराहचे भाजपा आमदार हंसराज यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. आमदारांच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर स्थानिक नागरिक पोलिसांना मदत करत आहेत. आमदार हंसराज यांनी नमूद केले की, या भागात ‘क्रॅश बॅरियर्स’ (सुरक्षा कठडे) नसल्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडतात. अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
















