लातूर : प्रतिनिधी
कांद्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. १५ दिवसांपूर्वी २० रुपयांना किलोभर मिळणारा कांदा आता थेट ६० रुपयांवर पोहोचला आहे. कांद्याच्या दरात तिप्पटीने वाढ झाली. परिणामी गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती बजेट कोलमडले आहे. कमी पावसामुळे कांद्याची आवक घटल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.
दरवाढीमुळे आता कांदा खरेदी करताना नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहे. बहूतांश ग्राहक गरजेपुरताच कांदा खरेदी करताना दिसत आहेत. किलोऐवजी अर्धा किलो किंवा कमी प्रमाणात खरेदी केली जात असल्याचे बाजारातील चित्र आहे. बाजारात कांदा कमी आल्याने मागणी पूर्ण करणे अवघड झाले आहे. उपलब्ध कांद्याच्या गुणवत्तेनूसार दरातही फरक पडत आहे. पुढील काही दिवसांत बाजारात कांद्याची आवक वाढली नाही तर दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आवक सुधारल्यास दरात काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या लातूरकरांसाठी कांदा हा पुन्हा महागाईचा विषय ठरला आहे. २० रुपयांवरुन ६० रुपयांपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दराने सर्वसामान्यांचे बजेट बिघडवले असून बाजारातील आवक वाढण्याची प्रतीक्षा ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही लागली आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने कांदा उत्पादनावर परिणाम झाला असून त्याचा थेट फटका बाजारातील आवकेला बसत आहे. कमी पावसामुळे काही भागांतील कांदा पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही. परिणामी नवीन कांदा बाजारात पुरेशा प्रमाणात दाखल झाला नाही. पूर्वी हजारो पोत्यांमध्ये होणारी आवक आता मोठ्या प्रमाणात घटली आहे. आवक कमी असताना मागणी कायम असल्याने कांद्याचे दर वाढले आहेत.
लातूरच्या बाजारपेठेत कांद्याची आवक पूर्वी मोठ्या प्रमाणात होत होती. दररोज हजारो पोती कांदा बाजारात दाखल होत असल्याने पुरवठा मुबलक आणि दर आवाक्यात होते. मात्र, सध्या परिस्थिती बदलली असून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या बाजारात दररोज केवळ २०० ते २५० पोती कांदा दाखल होत आहे. आवक घटलेली असताना मागणी कायम असल्याने कांद्याचे दर वाढले असून किरकोळ बाजारपेठेत कांदा प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
















