लातूर : प्रतिनिधी
वर्षानुवर्षे फरार राहून कायद्याला चकवा देणा-या आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तसेच फरार आरोपींच्या अभिलेखांचा सखोल आढावा घेत संबंधित अधिकारी व अंमलदारांना अशा आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष शोध मोहिमेत आणखी एक उल्लेखनीय यश पोलीसांना मिळाले आहे. पोलीस ठाणे भादा येथे २०१५ मध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल ११ वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.
दि. ५ ऑगस्ट २०१५ ते ६ ऑगस्ट २०१५ च्या मध्यरात्री दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलकुंड येथील परिसरातील चंदनाच्या झाडाचा गाभा अज्ञात व्यक्तींनी चोरी करून नेला होता. चोरीस गेलेल्या चंदनाची किंमत सुमारे ५ हजार रुपये होती. याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलकुंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पळंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ६ ऑगस्ट २०१५ रोजी पोलीस ठाणे भादा येथे गुरनं. ६६/२०१५, कलम ३७९ भादंवि तसेच भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र नितीन गोरख राऊत (वय ४८ वर्षे, रा. सर्जापूर, ता. बार्शी, जि. सोलापूर) व रामचंद्र उर्फ राम धर्मराज माळी (वय ५० वर्षे, रा. नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे दोन्ही आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते.
विशेष मोहिमेदरम्यान पोलीसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदारांचे जाळे तसेच विविध ठिकाणी पडताळणी करून या दोन्ही आरोपींचा माग काढला. अखेर त्यांना शोधून ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुरवणी दोषारोपपत्रासह त्यांना मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे, पोहेकॉ फिरोज शेख, कांबळे, पोना/पाटील, पोअं/मोरे यांनी केली आहे.
















