लातूर : प्रतिनिधी
अनुभवी गोपालक, ख्यातनाम शास्त्रज्ञ आणि दूरदृष्टी असलेल्या धोरणकर्त्यांच्या संयुक्त योगदानातून देशातील दुग्ध उत्पादनात गुणात्मक व संख्यात्मक वाढ झाली आहे. स्वातंत्र्यौत्तर काळात प्रतिव्यक्ती दुधाची उपलब्धता ११० ग्रॅमवरून सुमारे ४०० ग्रॅमपर्यंत वाढली असून दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण युवकांसाठी उद्योजकतेचे नवे दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
जिव्हाळा ग्रुप उदगीरच्या वतिने जागतीक दुध दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथराव मुडपे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ. अनिल भिकाने, प्रा. डॉ. विजय भामरे आणि प्रा. डॉ. राजेश शेळके उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. भिकाने यांनी जागतिक दुग्ध दिनाचे महत्त्व विशद केले. भारतातील धवल क्रांतीच्या यशामध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात आणि कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणात महिलांनी मोलाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रा. डॉ. विजय भामरे व प्रा. डॉ. राजेश शेळके यांनी दुध हे संपूर्ण अन्न असून ते लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. तसेच एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी खरीप हंगामात कमी कालावधीत आणि कमी पावसात येणा-या पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन करावे, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. याप्रसंगी डॉ. अशोक दारनुळे, रमाकांत बनशेळकीकर, दशरथराव शिंदे, मोहनराव खिंडीवाले, लक्ष्मीकांत बिडवई, मनोहर कुलकर्णी, पांडूरंग बोडके, बाबुराव वाघमारे, अशोक हळळे, सोपानराव माने, चंद्रकांत रोडगे, शरणप्पा खेळगे, शंकरराव साबणे, अमृतराव देशपांडे, षणमुखानंद मठपती, हावगीराव आचारे, लहुदास याचावाड आदी मान्यवर उपस्थित होते.
















