चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील चापोली येथील नंदादीप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी यंदा पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला आहे. शाळेच्या प्रांगणात आणि परिसरातील झाडांना राख्या बांधून ‘झाडे जगवा, जीवन वाचवा’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात हा अनोखा सोहळा साजरा केला. रक्षाबंधनानिमित्त बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि रक्षणाची कामना करते परंतु या परंपरेला सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजगृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरातील विविध वृक्षांना पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू लावून, औक्षण करून आणि सुंदर, पर्यावरणपूरक राख्या बांधून केली. विशेष म्हणजे, याच दिवशी ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ असल्याने शारीरिक आरोग्यासाठी जसा खेळ महत्त्वाचा आहे, तसेच उत्तम आरोग्यासाठी शुद्ध आणि हिरवेगार पर्यावरणही तितकेच गरजेचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या रक्षाबंधनामुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साह दिसून आला. शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि पालकांनी विद्यार्थिनींच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले असून, यातून ख-या अर्थाने निसर्गाशी आपले नाते घट्ट होण्यास मोठी मदत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमाबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गाबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण करणे गरजेचे आहे. आजची मुले ही उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून झालेली या रोपांची जोपासना भविष्यात वनात रूपांतरित होईल. यावेळी शाळेचे संचालक शिवानंद स्वामी, संचालिका निकिता स्वामी, शितल होनराव, वैष्णवी होनराव, रूपाली शंकरे, अनुराधा येनगे, आकांक्षा येनगे, हजराबी देशमुख, मेघा बेद्रे, नगीना शेख, पूजा बिडवे, स्वप्ना भोसले आदी उपस्थित होते.
















