शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील पांढरवाडी तलावातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी तहसील प्रशासन व पाटबंधारे विभाग व महावितरणने धडक कारवाई केली आहे. तलावातून शेतीसाठी सुरू असलेला अनधिकृत पाणी उपसा बंद करण्यात आला असून संबंधित वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करून पाणी उपशासाठी वापरण्यात येणा-या मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पांढरवाडी तलावातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. तलावातील उपलब्ध पाणी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपसा केला जात असल्याने येरोळ, पांढरवाडी, हनमंतवाडी व जांभळवाडी या गावांच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासन व पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे कारवाई करत तलावातून होणारा शेतीसाठीचा पाणी उपसा थांबविला. पाणी उपसा करणा-या विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या असून, संबंधित वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे तलावातील उर्वरित पाणीसाठा पिण्यासाठी सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. दरम्यान पांढरवाडी तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून शेतीसाठी अनधिकृत पाणी उपसा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पथकात मंडळ आधिकारी नवनाथ खंदाडे, तलाठी डी. बी. हाळे, आकाश आलुरे, कोतवाल भागवत चिंचोलकर, पाठबंधारे विभागाचे एस. आर. म्हैसवाड, आर. सी. पांचाळ यांचा समावेश होता. पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता तलावातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
















