परभणी : शहरात मागील दोन दिवसांत तापमान ४० अंशाच्या खाली आल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. परंतू शहरात रविवार, दि.१० मे रोजी पुन्हा एकदा सुर्य तळपला असून किमान २५ तर कमाल तापमान ४१.६ अंश वनामकृविच्या हवामान विभागात नोंद करण्यात आले. पारा पुन्हा एकदा एकदम ३ अंशाने वाढल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शहरात यावर्षी नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. दोन आठवड्यांपुर्वी शहरातील तापमान ४५ अंशापर्यंत पोहचल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते. बाजारपेठ देखील ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. तीव्र उकाड्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.
दोन दिवसांपासून वादळी वा-यासह अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. रविवारी पुन्हा एकदा सकाळ पासूनच सुर्य तळपत होता. पारा ४१ अंशापुढे गेल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला.

