छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेतील महिला उमेदवारांना, परीक्षा हॉलकडे जाताना, त्यांच्याकडील मंगळसूत्र काढायला लावण्याच्या प्रकारावर, राज्यात संतापाची लाट पसरली आहे. परीक्षा की अपमान? असा प्रश्न केला जात आहे.
परीक्षा पर्यवेक्षकांच्या या कार्यपद्धतीवर संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘ऍक्शन मोड’वर आले आहे. ‘झालेल्या प्रकारावर योग्य सूचना दिल्या जातील तसेच चौकशी केली जाईल,’ असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर इथं दौ-यावर होते. सुपा एमआयडीसी इथं तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन झालं. यानंतर मुख्यमंर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगरमध्ये उळएळ परीक्षेदरम्यान महिला परीक्षार्थ्यांना मंगळसूत्र काढण्याच्या प्रकारावर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाल् अशा प्रकारच्या तक्रारी मागच्याही काळात आल्या होत्या. नेमकं काय झालं, या संदर्भात मी नेमकी माहिती घेईल. मागच्या वेळेस चौकशी केली असता, परीक्षा घेणा-या यंत्रणेकडून सांगण्यात आलं की, परीक्षेत गैरप्रकार करण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले जातात, ‘इक्विपमेंट’ लपवले जातात. असं करणं पण देखील योग्य नाही. या संदर्भात अधिक काळजी घेतली जाईल. योग्य सूचना दिल्या जातील आणि चौकशी केली जाईल.
६ फेब्रुवारीला सीटीईटी परीक्षेच्या वेळी, छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रांवर सुरक्षारक्षकांनी धातूचे साहित्य आत नेता येणार नाही, असे सांगत महिलांना मंगळसूत्रे, अंगठ्या आणि इतर दागिने काढण्याची सक्ती केली. यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. परीक्षार्थी महिला आणि त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांची या मुळे धावपळ उडाली. हा कोणता नियम आहे? अशी विचारणा केली. असा लेखी नियम आहे का? अशी मागणी महिला उमेदवारांबरोबर आलेल्या नातेवाईकांनी केली.
याचवेळी दागिने काढून ठेवण्यासाठी नातेवाईक सोबत नसलेल्या महिलांना उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागला. यातून परीक्षा केंद्रावर अधिकच वाद उफळला. अनेक महिला उमेदवारांना चांगलाच मनस्ताप झाला. परीक्षा केंद्रावर या सक्तीमुळे महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि सुरक्षिततेच्या नावाखाली ही अडवणूक चुकीची असल्याची भावना व्यक्त केली.

