जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील पाटोदा बु येथील एक २२ वर्षीय युवक गावाशेजारीस असलेल्या विहिरीत पोहायला गेला होता. त्याने पोहायची शेवटची उडी मारू, असे म्हणत विहिरीत उडी मारली, आणि तो बाहेर आलाच नाही रात्री ७ वाजता त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
जळकोट तालुक्यातील रमजान बोंडुंगे (वय २२) हा युवक आपल्या मित्रांसमवेत गावाशेजारील असलेल्या एका शेतक-याच्या शेतातील विहिरीमध्ये दि २ जून रोजी दुपारी ३ च्या दरम्यान पोहायला गेला होता. या युवकास पोहताही येत होते. सर्वांचे पोहणे झाल्यावर आता एक शेवटची उडी मारू व गावाकडे जाऊ असे रमजानने सांगितले. त्याने उंचावरून उडी मारली मात्र तो बाहेर आलाच नाही मित्र थोडा वेळ वाट बघितली मात्र तो बाहेर न आल्यामुळे याची माहिती घरी दिली. यावेळी पाहुणेमंडळी तसेच गावातील नागरिक त्या विहिरीकडे धावले. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला परंतु लवकर बाहेर काढता आले नाही .
यानंतर विशेष पथकास पाचारण करण्यात आले परंतु माळहिप्परगा येथील शेतकरी पांडुरंग तिडके यांनी विहिरीमध्ये उडी मारून सदरील बुडालेल्या युवकास बाहेर काढले. विहिरीतून बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान विहिरीच्या अवतीभोवती गावक-यानी मोठी गर्दी केली होती . त्याच्या आईला तो एकुलता एक मुलगा होता. रमजानने शेवटची उडी मारली आणि यामध्ये त्याच्या जीवनाचा शेवट झाला. उडी मारल्यानंतर तो गाळामध्ये फसून बसला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण पाटोदा गावावर शोककळा पसरली आहे . सदरील युवकाचा मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.
















