परीक्षांमधील गैरप्रकार आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा संस्थापक अभिजीत दिपके ६ जून रोजी भारतात परतणार आहे. दिल्लीत एका शांततापूर्ण आंदोलनाद्वारे तो आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलेल्या व्हीडीओमध्ये दिपके याने त्याचे समर्थक आणि विद्यार्थ्यांना दिल्लीतील या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आता आपल्या सर्वांना एकत्र येण्याची वेळ आली आहे. भारतीय संविधानाच्या मार्गाने जात, शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आपल्याला करायची आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला तर त्यांना नक्कीच ऐकावे लागेल, असे दिपकेने व्हीडीओत म्हटले आहे. दिपके याने समर्थकांना ६ जून रोजी विमानतळावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
तो पुढे म्हणतो, मी शनिवारी ६ जून रोजी सकाळी दिल्लीत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया तुम्ही सर्वांनी विमानतळावर माझ्यासोबत सामील व्हा. तेथून आपण एकत्र जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी मागण्याकरिता पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात जाऊ. एकंदरीत झुरळ काय काय करामती करेल ते सांगता येत नाही. परंतु या झुरळाने दिल्ली तख्त हादरवले आहे एवढे मात्र खरे! भारतीय महिला झुरळाला अतिशय घाबरतात हे सार्वकालीन सत्य आहे. झुरळ स्वयंपाकघरात दिसले की, झांशीच्या राणीचा आव आणणारी महिला आरडाओरड सुरू करते, मग राणा भीमदेवी थाटात पतीदेव झाडू घेऊन येतात आणि झुरळाचे पानिपत करतात. पण गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत नवलच घडले.
५६ इंच छाती असलेले केंद्र सरकार एका झुरळामुळे इतके हादरले की, इतरांना हे काय झाले ते कळलेच नाही. मुख्य न्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे वातावरण इतके तापले आहे की, बेकार तरुणांना त्यांनी कॉक्रोच आणि पॅरासाईट(बांडगूळ) असे संबोधून सरकारसाठी एक उदे्रकच ओढवून घेतला. अत्युच्च पदावर बसलेल्या एका न्यायाधीशाने गरीब आणि बेकार तरुणांबाबत कनवाळूपणा दाखवावा अशी अपेक्षा असताना त्यांनी जे विधान केले त्यामुळे मोदी सरकार अडचणीत आले आहे. आजच्या जनरेशन झेडच्या जमान्यात समाज माध्यमावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची स्थापना करण्यात आली आणि तिच्याशी लाखो तरुण जोडले गेले. दहा दिवसांत या मोहिमेबरोबर २.३ कोटी तरुण जोडले गेले असा दावा या चळवळीचे जनक अभिजीत दिपके याने केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या चळवळीमागे परकीय शक्तींचा हात आहे आणि तिच्याशी जोडले गेलेले बहुतांश विदेशी आहेत असा दावा केला. हा दावा खोडून काढताना आमच्या मोहिमेशी जोडले गेलेले ९४ टक्के लोक भारतीय आहेत आणि ते शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन करण्याकरिता प्रतिबद्ध आहेत असे दिपकेने सांगितले. ज्या प्रकारे मराठवाड्यातील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारला सळो की पळो करून सोडले आहे,
त्याचप्रमाणे मराठवाड्यातीलच अभिजीत दिपके मोदी सरकारची स्थिती करणार असे दिसते. गमतीची गोष्ट म्हणजे गत १२ वर्षांत समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून जसे भाजपने विरोधकांना निष्प्रभ केले, तशाच प्रकारे एक झुरळ कोठून तरी येते आणि राजकीय सुपरस्टार बनते, हा सारा प्रकार मजेशीरच म्हणावा लागेल. या प्रकाराने सत्ताधारी हैराण झाले आहेत. भाजपचा सारा कारभारच हडेलहप्पी आहे. जिथे सोनाराचा छोटा हातोडा वापरायचा तिथे ते लोहाराचा घण वापरून परिस्थिती आणखीनच नाजूक बनवतात असे वारंवार दिसून आले आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे समाज माध्यमांवर एका आठवड्यात इतके फॉलोअर्स वाढले की, त्यामुळे भाजपची पंचाईत झाली. १२ वर्षांत भाजपला जे जमले नव्हते ते या चळवळीने एका आठवड्यात साध्य करून दाखवले. भाजपचे ७८ लाख फॉलोअर्स आहेत म्हणे! कुठे ७८ लाख अन् कुठे २ ते ३ कोटी! सध्या झुरळाची क्रेझ वाढत आहे. तरुणाई या चळवळीकडे आकर्षित झाली आहे. भाजप, काँग्रेससह कोणताही मोठा पक्ष तरुणाईशी असा संवाद साधू शकलेला नाही. त्यामुळे झुरळाचे महत्त्व वाढले आहे यात शंका नाही.
एक अनरजिस्टर्ड पक्ष असूनही कॉक्रोच जनता पार्टीने भारतीय राजकारण ढवळून काढले आहे. कारण त्याच्या नव्या प्रचारपद्धती लोकांना भावू लागल्या आहेत. सरकारने या पक्षाच्या एक्स हॅण्डलवर बंदी घातली, मात्र त्याचा परिणाम उलटाच झाला. इन्स्टाग्रामवर ‘कॉक्रोच’चे फॉलोअर्स प्रचंड प्रमाणात वाढले. या अनपेक्षित संकटाने भाजप एवढी हैराण झाली की, लडाखचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सोनम वांगचूक सारख्या नेत्याला कॉक्रोच जनता पार्टीपासून दूर राहण्याची ताकीद दिली. विदेशी शक्ती या पक्षामागे आहेत असाही आरोप करण्यात आला. याचा अर्थ असा की, या पक्षाला कशा प्रकारे हाताळायचे तेच सरकारला कळेनासे झाले आहे. दिपके यांच्या आई-वडिलांना धमक्या मिळत आहेत, त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. भारतात पाय ठेवल्याबरोबर सरकार आपल्याला अटक करणार अशी भीती दिपकेने व्यक्त केली आहे. काय होणार ते ६ जून रोजी दिसेल. कॉक्रोच जनता पार्टी ही केवळ सोशल मीडियावरील एक उपहासात्मक चळवळ नाही, ती आजच्या तरुणाईच्या मनातील अस्वस्थतेचे, बेरोजगारीचे, व्यर्थतेच्या भावनेचे आणि संस्थांवरच्या अविश्वासाचे प्रतीक बनली आहे. सरकारने तरुणांची निराशा समजून घेणे आवश्यक आहे.
















