पूर्णा : तालुक्यातील एरंडेश्वर येथे शेतक-यांचा विश्वास संपादन करून तब्बल १०० ते १५० शेतक-यांचे सुमारे ६ हजार ८०० क्विंटल शेतमाल घेऊन व्यापारी मुलांसह फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात शेतक-यांची सुमारे साडेपाच कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दि. १७ जुलै पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर हे शेती प्रधान गाव आहे. येथे वास्तव्यास असलेले शेख हमीद शेख बालेसाब व त्यांचा मुलगा शेख सरू शेख बालेसाब यांनी सुरुवातीला शेतक-यांकडून नियमितपणे शेतमाल खरेदी करून वेळेवर पैसे दिले. त्यामुळे परिसरातील अनेक शेतक-यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्री केली.
मात्र, मागील काही महिन्यांत संबंधित व्यापा-यांनी १ हजार ९६ क्विंटल हळद, ३ हजार ६३० क्विंटल सोयाबीन, २ हजार ००० क्विंटल हरभरा, ५७ क्विंटल गहू आणि ३५ क्विंटल तूर असा एकूण सुमारे ६ हजार ८०० क्विंटल शेतमाल खरेदी केला. या मालाची उचल केल्यानंतर लवकरच पैसे देण्याची वारंवार आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात पैसे देण्यात आले नाहीत. काही दिवसांनंतर व्यापारी आपल्या मुलासह गावातून निघून गेल्याचे कळल्यानंतर शेतक-यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर संतप्त शेतक-यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात धाव घेत प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड यांच्याकडे सामूहिक तक्रार दाखल केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात शेकडो शेतकरी आर्थिक फसवणुकीचे बळी ठरले आहेत. लंपास झालेल्या शेतमालाची बाजारभावानुसार किंमत सुमारे साडेपाच कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित व्यापा-याविरूध्द गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे एरंडेश्वरसह संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. संबंधित व्यापा-याला तातडीने अटक करून शेतक-यांचे पैसे वसूल करावेत अशी जोरदार मागणी होत आहे.
















