मुंबई : वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात दिवसभर मोठी अस्थिरता दिसून आली. सकाळी गॅप-डाऊन ओपनिंग झाल्यानंतर बाजार जवळपास पूर्ण वेळ लाल निशाणीवर ट्रेड करत होता. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात एनडीए युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचे चित्र स्पष्ट होताच, बाजारात अचानक मोठी तेजी आली आणि प्रमुख निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले.
हा ट्रेंड सत्तारूढ भाजपला एकट्याने १०० चा आकडा पार करण्याची आणि जेडीयूच्या मदतीशिवायही सरकार स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाल्याने अधिक बळकट झाला.
दिवसातील नीचांकी स्तरावरून सेन्सेक्सने तब्बल ५०० हून अधिक अंकांची जोरदार रिकव्हरी केली. अखेरच्या क्लोजिंगला तो ८४.११ अंकांनी (०.०९%) वाढून ८४,५६२.७८ वर बंद झाला. तर निफ्टीनेही १७० अंकांची रिकव्हरी नोंदवली आणि तो ३०.९० अंकांनी (०.१२%) वाढून २५,९१०.०५ च्या स्तरावर बंद झाला.
या तेजीला ‘बुल्स रन’ असे म्हटले जात आहे, कारण गुंतवणूकदारांनी राजकीय स्थिरता कायम राहिल्यास विकासाचे प्रकल्प वेगाने पुढे सरकतील, या अपेक्षेने जोरदार खरेदी केली. शुक्रवारच्या या उलथापालथीमध्ये काही निवडक शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली, तर ‘आयटी’ शेअर्स विक्रीच्या दबावाखाली राहिले. इन्फोसिसमधील मोठी घसरण असूनही, बाजाराने दमदार राजकीय संकेतामुळे आपला शेवट सकारात्मक केला.

