परभणी : परभणी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. पान टपरी बसवताना ६ जणांना विजेचा धक्का लागला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन अत्यवस्थ आहेत. परभणीच्या पालममधील बालाजी नगर इथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
परभणीच्या पालममधील बालाजी नगर येथील शेख शफीक शेख मुसा यांची पान टपरी होती. त्यांनी ती बैलगाडीतून घरी आणल्यानंतर खाली उतरण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा टपरी घसरुन बैलगाडीवरील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागली. यात काम करणारे सिद्धार्थ नरहरी बावळे, शेख शफीक शेख मुसा व शेख शौकत शेख मुसा या तीन जणांना विजेचा तीव्र धक्का बसला.
या तिघांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या अपघातात शेख फरहान शेख महेबूब, शाकेर शेख व शेख असलम शेख गुड्डू हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या साई हॉस्पिटल, लोहा येथे उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पालम शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
















