पुणे : गुण किती मिळाले? या एका प्रश्नाभोवती विद्यार्थ्यांचे भविष्य, पालकांच्या अपेक्षा आणि करिअरची चिंता गुरफटत चालली आहे. पुण्यासारख्या शिक्षणनगरीत तरुण आणि विद्यार्थ्यांशी संबंधित आत्महत्यांच्या घटनांनी ही गंभीर बाब पुन्हा ऐरणीवर आणली आहे. परीक्षा, प्रवेश, करिअरची स्पर्धा, कौटुंबिक प्रश्न, मानसिक अस्वस्थता आणि सामाजिक दबाव अशा अनेक घटकांचा ताण तरुणांच्या मानसिक आरोग्यावर पडत आहे.
पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार शहरात २०२३ मध्ये गुन्हे दाखल असलेल्या व अकस्मात मृत्यू म्हणून नोंद असलेल्या १,००४ आत्महतेच्या घटनांची नोंद आहे. २०२४ मध्ये ९७८, २०२५ मध्ये १०६७ घटनांची नोंदविल्या गेल्या आहेत. जानेवारी ते जूलै २०२६ या सात महिन्यांत शहरात ६०१ आत्महत्यांची नोंद झाली. त्यात ४२३ पुरुष आणि ११८ महिलांचा समावेश आहे. बुधवारी (दि. ९) एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या वेगवेगळ्या घटना समोर आल्याने तरुण आणि विद्यार्थ्यांशी संबंधित घटनांनी चिंता वाढवली आहे. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या धाराशिवच्या २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना बुधवारी (दि. ९) समोर आली.
प्रथमेश देशमुख असे त्याचे नाव आहे. स्पर्धा परीक्षेतील वारंवार अपयश, आर्थिक अडचणी, शेतीचे नुकसान आणि कर्जाचा वाढता ताणामुळे मानसिक तणावात त्याने टोकाचे पाऊल उचल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. दुस-या घटनेत कात्रज परिसरात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय आदी माया शेखर रेड्डी (रा. मूळ तिरूमलंगरी, हैद्राबाद, तेलंगणा) विद्यार्थ्यीनीने दहाव्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. एकाच दिवशी घडलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या दोन घटनांनी शैक्षणिक क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आहे.
यापूर्वीही अपेक्षित गुण न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा आणि करिअरचा ताण हा तरुणांच्या मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा संभाव्य घटक म्हणून चर्चेत आला आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची किंमत एका परीक्षेच्या निकालापेक्षा कितीतरी मोठी आहे. त्यामुळे गुणांच्या स्पर्धेपेक्षा संवाद आणि मानसिक आधाराला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.
‘गुण कमी म्हणजे आयुष्य संपले’ ही मानसिकता
विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ही आयुष्याचा एक टप्पा आहे; अंतिम निर्णय नाही. मात्र, पालकांच्या अपेक्षा, सातत्याने होणारी तुलना, प्रवेशासाठीची तीव्र स्पर्धा आणि सोशल मीडियावरील यशाचे दबावाचे चित्र यामुळे काही विद्यार्थ्यांना अपयश अस वाटू शकते. अनेकदा विद्यार्थी आत्महत्यांच्या कारणांमध्ये कौटुंबिक समस्या, प्रेमसंबंध, आजारपण आणि परीक्षेतील अपयशासह करिअरविषयक समस्या, एकटेपणा, मानसिक विकार, व्यसन आणि आर्थिक नुकसान यांसारखी कारणे समोर आली आहेत.
पालकांनी संवाद वाढविण्याची गरज
विद्यार्थ्यांच्या वर्तनात अचानक बदल, सतत निराशा, एकटेपणा, अभ्यासातील रस कमी होणे, झोप-भुकेतील बदल किंवा भविष्यासंदर्भात तीव्र नकारात्मकता दिसल्यास ते दुर्लक्षित करू नये. अशा वेळी किती गुण मिळाले? यापेक्षा तुला कसे वाटते? हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. वेळेवर समुपदेशन आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत मिळणे महत्त्वाचे आहे.
















