पुणे : देशात आणि राज्यात एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न अतिशय गंभीर बनले आहेत. मराठा, ओबीसी आणि आदिवासी समाजाची मुले आंदोलने करत आहेत. राज्यात वाढती महागाई, बेरोजगारी, प्रचंड भ्रष्टाचार आणि दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, देशात आयआयटी आणि आयआयएमच्या परीक्षा होतात, तिथले पेपर का फुटत नाहीत? मग आपल्या एमपीएससी परीक्षांमध्येच हे घोटाळे का होतात? पेपर फुटण्यामागचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील शेतकरी जर एआय तंत्रज्ञानाचा वापर करू शकत असेल, तर परीक्षा यंत्रणेत या तंत्रज्ञानाचा वापर का केला जात नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संजय राऊत हे देशाचे मोठे नेते आहेत. अजित पवारांच्या मृत्यूबद्दल त्यांचे जे काही म्हणणे असेल ते त्यांचे वैयक्तिक मत आहे; परंतु मी आता या विषयावर काहीही बोलणार नाही. तुम्हाला याबद्दल काही विचारायचे असेल, तर थेट सरकारला विचारा, कारण सर्व यंत्रणा सरकार चालवत आहे. मी या विषयावर बोललेले लोकांना आवडत नाही. कोणाच्याही भावनांचा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता, मी अत्यंत पोटतिडकीने आणि अंतकरणापासून बोलले होते. पण ते लोकांना आवडले नसेल, तर मी पुन्हा त्यावर बोलणार नाही; त्यामुळे तुम्ही सत्ताधा-यांनाच हे प्रश्न विचारले पाहिजेत. तसेच पार्थ पवार प्रकरणाबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला पाहिजे. ते गृहमंत्रीसुद्धा असल्याने या दोन्ही प्रश्नांची योग्य उत्तरे तेच देऊ शकतील.
शेतक-यांच्या आत्महत्या समर्थनीय नाहीत
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात आमच्या सत्ताकाळातही शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या; परंतु त्यानंतर शरद पवार यांनी ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी केली होती. सध्या राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतक-यांच्या आत्महत्या कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाहीत. सध्याच्या सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी आहे, त्यांनी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कर्जमाफी केलेली नाही. सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा केली पाहिजे. राज्यात सध्या जातीय तेढ निर्माण झाली असून ती अत्यंत चिंताजनक आहे.
यामध्ये यंत्रणेचाच दोष
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एमपीएससीच्या परीक्षेमुळे निराश झालेल्या एका महिलेचा मला काल रात्री फोन आला होता. तिने संभाषणात आत्महत्या असा शब्द वापरल्याने मी तातडीने तिची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिस यंत्रणेचे मी मनापासून आभार मानते, कारण त्यांनी वेळीच जाऊन त्या महिलेचे समुपदेशन केले आणि तिची समजूत काढली. या संपूर्ण प्रकरणात मुलांची काहीही चूक नसून सर्वस्वी परीक्षा यंत्रणेचाच दोष आहे.
















