मुंबई/पुणे : एसटीच्या विविध सवलतींसाठी अनिवार्य केलेल्या एनसीएमसी कार्डच्या पहिल्या दोन दिवसांच्या गोंधळानंतर एसटी महामंडळ आणि ई-बेक्स कंपनीने प्रवाशांच्या गैरसोयींवर तात्पुरता तोडगा काढत यंत्रणा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, रिचार्जच्या पातळीवरही गोंधळ कायम असून वाहकाकडे रिचार्ज केल्यास कमी, तर एजंटकडे केल्यास अधिक रक्कम कपात होत असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. एकाच कार्डासाठी एकाच रकमेचा रिचार्ज करूनही दोन ठिकाणी वेगवेगळी कपात होत असल्याने जादा रक्कम नेमकी कोणाच्या फायद्यात जाते, याचे उत्तर मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एनसीएमसी कार्डच्या रिचार्जसाठी एसटी प्रशासनाने सर्व बसस्थानके आणि आगारांवर अतिरिक्त वाहकांची व्यवस्था केली आहे. बसस्थानकावरील अथवा बसमधील वाहकाकडे तसेच कार्ड एजंटकडे ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येतो. मात्र, दोन्ही ठिकाणी जीएसटी आणि शुल्काच्या नावाखाली होणारी कपात वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, वाहकाकडे १०० रुपयांचा रिचार्ज केल्यास प्रवाशाला ९८.९४ रुपये मिळतात. त्यातून जीएसटी ०.१६ रुपये आणि लागू शुल्क ०.९० रुपये कपात होते. मात्र, हाच रिचार्ज एजंटकडे केल्यास प्रवाशाच्या कार्डवर केवळ ८७.१४ रुपये जमा होतात. त्यातून जीएसटी १.९६ रुपये आणि १०.९० रुपये सुविधा शुल्काची कपात होते. वाहकाच्या मशिनवर ‘लागू शुल्क’ (अॅप्लिकेबल फी), तर एजंटच्या मशिनवर ‘सुविधा शुल्क’ (कनव्हिनियन्स फी) असा वेगळा पर्याय दिसतो. त्यामुळे कमी कपात होत असल्याने वाहकाकडे रिचार्ज करण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दुसरीकडे, जादा कपातीबाबत एजंटही अनभिज्ञ असल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.
जादा कपातीबाबत एजंटही अनभिज्ञ
ई-बेक्स कंपनीकडून मशिन घेऊन अनेक एजंट एनसीएमसी कार्ड काढणे आणि रिचार्ज करण्याचे काम करीत आहेत. मात्र, रिचार्ज करताना एजंटच्या मशिनवरून अधिक रक्कम का कपात होते, याची माहिती त्यांनाही नाही. या कपातीत एजंटला कमिशन मिळते का, याबाबतही स्पष्टता नाही. रिचार्जची संपूर्ण रक्कम कपात होते; मात्र अतिरिक्त परतावा सध्या मिळत नसल्याचे एजंटांचे म्हणणे आहे.
एजंट हवालदिल
एनसीएमसी कार्ड एजंटांना कंपनीने अक्षरश: वा-यावर सोडल्याची स्थिती आहे. तांत्रिक अडचणी, मशिनमधील बदल आणि नवीन अपडेटबाबत कंपनीकडून पुरेशी माहिती दिली जात नसल्याची एजंटांची तक्रार आहे. अडचणी निर्माण झाल्यास कंपनीची अधिकृत व्यक्तीही प्रतिसाद देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्व्हर डाऊनमुळे पेमेंट अडकणे, प्रवाशाच्या कार्डवर रक्कम जमा न होणे आणि अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी चार ते पाच दिवस लागणे, अशा समस्यांना एजंटांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी ग्राहकही हातातून निसटत असल्याची त्यांची व्यथा आहे.
















