कोलकाता: पश्चिम बंगालमधील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज एका भावनिक प्रसंगामुळे देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मंचावर पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ९२ वर्षीय वृद्ध कार्यकर्त्याच्या पाया पडून त्यांना आलिंगन दिले. हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते माखनलाल सरकार. पंतप्रधानांनी दाखवलेल्या या आदरभावामुळे माखनलाल सरकार कोण आहेत आणि त्यांचा राजकीय प्रवास काय आहे, याबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
कोण आहेत माखनलाल सरकार?
माखनलाल सरकार हे केवळ भाजपचे कार्यकर्ते नसून ते भारतीय जनसंघाच्या काळातील एक जिवंत इतिहास आहेत. त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी. माखनलाल सरकार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनसंघापासून केली होती. आजही वयाच्या ९२ व्या वर्षी ते पक्षाच्या कामात तितकेच सक्रिय आहेत. भाजपचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत त्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे. मुखर्जींच्या विचारधारेने प्रेरित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षसंघटनेसाठी समर्पित केले.
१९५३ मध्ये जेव्हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक विधान, एक निशान, एक प्रधान’ ही घोषणा देत काश्मीरमधील ‘परमिट राज’ विरोधात आंदोलन पुकारले होते, तेव्हा माखनलाल सरकार त्यांच्यासोबत होते. पंजाब-जम्मू सीमेवर (माधोपूर) आंदोलकांवर कारवाई झाली, तेव्हा डॉ. मुखर्जी यांच्यासोबत माखनलाल सरकार यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनी या आंदोलनासाठी दीर्घकाळ तुरुंगवासही भोगला आहे.
शपथविधी सोहळ्यातील तो खास क्षण
पश्चिम बंगालमधील सत्तास्थापनेच्या या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी शिष्टाचारापेक्षा ज्येष्ठतेला आणि निष्ठेला महत्त्व दिले. मंचावर येताच त्यांनी सर्वात आधी माखनलाल सरकार यांच्याकडे जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श केला. त्यानंतर त्यांना प्रेमाने मिठी मारून शाल देऊन त्यांचा सत्कार केला.
“एखाद्या कार्यकर्त्याची पक्षाप्रती असलेली ७० वर्षांची निष्ठा जेव्हा देशाचे पंतप्रधान अशा प्रकारे सन्मानित करतात, तेव्हा तो क्षण संपूर्ण राजकीय क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरतो,” अशा प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांमधून उमटत आहेत.
















