लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या लातूर महानगर शाखेच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्कारांचे वितरण बुधवार दि. २० मे रोजी उत्साहात पार पडले. भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार सोहळयास प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे उपस्थित होते. गाव सुसंस्कृत ठेवायचं तर गावातील सांस्कृतिक चळवळ जीवंत असायला हवी, असे मिलिंद शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
या सोहळ्यात रंगकर्मी स्व. बंकट पुरी पुरस्कार अभिनेता संकर्षण क-हाडे यांना रंगमंचीय कार्य गौरव पुरस्कार अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांना तर स्व. विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार प्रदीप भोकरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती मुंबई शाखेचे प्रतिनिधी म्हणून सतीश लोटके उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मिलिंद शिंदे म्हणाले की, नाट्य संमेलनं, साहित्य संमेलनं, पुरस्कार वितरण सोहळे, बालनाट्य महोत्सव, असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत. त्यातूनच माणसांची मने तयार होतात.
पुरस्काराला उत्तर देताना संकर्षण क-हाडे म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे माझ्यासारख्या मराठवाड्याच्या सुपुत्राचा घरातला कौतुक सोहळा आहे. ज्यामुळे मला भविष्यात अभिनय क्षेत्रात वावरताना नवी भरारी घेण्याचं बळ मिळणार आहे. तर श्रीमती निलम शिर्के म्हणाल्या की, बालरंगभूमी परिषदेच्या कार्याचा हा गौरव आहे. तो केवळ माझा नाही तर महाराष्ट्रातल्या हजारो बालकलाकारांचा हा सन्मान आहे. भोकर म्हणाले की, मी शब्दात उत्तर देणार नाही तर इथून पुढे लातूरच्या नाट्यचळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी अधिक कार्यरत रहाणं हेच उत्तर होऊ शकेल.
प्रास्ताविकात नाट्यपरिषद महानगर शाखेचे अध्यक्ष अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत रंगकर्मी कल्याण वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्व. रंगकर्मी बंकट पुरी यांच्याविषयी व स्व. विजयकुमार धायगुडे यांच्याविषयी अनुक्रमे अनिल पुरी व अश्विनी धायगुडे यांनी माहिती विषद करत, पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. सन्मानपत्राचे वाचन अनुक्रमे प्रमोद कांबळे, डॉ. संतोष कुलकर्णी आणि वसुधा पाटील यांनी केले. आभार डॉ. दीपक वेदपाठक यांनी मानले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी महानगर शाखेच्या उपाध्यक्षा अर्चना पोपडे, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष रणजित आचार्य, कोषाध्यक्ष रवी आघाव, सुमती बिडवे-सोमवंशी, राजीव गड्डीमे, अभिषेक शिंदे, विशाल वाटवडे, पृथ्वीराज चव्हाण, भीम दुनगावे, कृष्णा खानापुरे, राम रेड्डी, प्रिती ठाकूर, योगिता जाधव, महेक अन्सारी, मयुरी वाघमारे, तृप्ती रणसुभे, महेश बिडवे आदींनी परिश्रम घेतल.े
















