शिंदे दिल्लीत, जयंत पाटील वर्षा बंगल्यावर
मुंबई/नवी दिल्ली : प्रतिनिधी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर राजधानी दिल्ली आणि मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटातील बंडखोर खासदारांना सोबत घेऊन दिल्लीत दाखल झाले असून, रात्री उशिरा ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते. दरम्यान, मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यामुळे या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातच आगामी अधिवेशनात महिला आरक्षणासोबत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नव्याने मांडले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खासदारांचे पाठबळ मिळवून बहुमताने हे विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खासदार फोडून एनडीएला बळ मिळवून देण्यासाठी नेते कामाला लागले आहेत. यातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला भगदाड पाडले. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला धक्का देण्याची तयारी सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.
दरम्यान, मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदारांना घेऊन दिल्लीत दाखल झाले आणि ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गुप्तगू करणार आहेत. त्याचवेळी मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. विशेष म्हणजे तत्पूर्वी जयंत पाटील आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची एकत्रित बैठक झाली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचे समजते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर नेमकी काय चर्चा झाली, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
सव्वातास चर्चा?
शरद पवार पक्षाचे जयंत पाटील आणि अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सव्वातास चर्चा केली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
शरद पवार गट एनडीएसोबत?
शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यामुळे शरद पवार गट एनडीएसोबत जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शरद पवार पक्षाचे काही आमदार आणि खासदार भाजपसोबत जायला उत्सुक असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल.
















