लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना, लि., वैशालीनगर, निवळी ता. लातूर येथील कारखान्यात गळीत हंगाम वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे केली जात आहेत. याच तयारीचा एक भाग म्हणून मंगळवार दि. २१ जुलै रोजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख आणि संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आला. या पूजनानंतर संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगाम तयारीबाबत आढावा बैठकही संपन्न झाली.
विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने सर्व हंगामपूर्व यंत्रसामुग्री देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगाम २०२६-२७ यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे. कारखान्याकडे सभासदांच्या १४७१९.७८ हेक्टर तर बिगर सभासदांच्या ६११३.०९ हेक्टर, अशी एकूण २१०३२.८७ हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. विलास साखर कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असून, या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणीयंत्राद्वारे तोडणी करण्यात येणार आहे. भविष्यात ऊसाची उपलब्धता पाहता, १०० टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे केल्यानंतर ऊसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसविण्यात येत आहे.या हंगामात तांत्रिक कारणांमुळे कारखाना बंद तास कमी राहतील याची दक्षता घेतली जाणार आहे. हंगाम बंद असताना सुरू असलेली मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, लवकरच कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज असेल अशी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास सहकारी साखर कारखाना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत आहे. विलास सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ऊस उत्पादकांना प्रति मे. टन रुपये ३१७१ इतका उच्चांकी दर दिला आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद आणि ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये मोठे आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. या विक्रमी दरामुळे शेतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत झाली असून, कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
मील रोलर पूजन कार्यक्रमास माजी आमदार तथा व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, संचालक रवींद्र काळे, अमृत जाधव, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील,रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, दीपक बनसोडे, लताबाई देशमुख, सुभाष माने, ऊस उत्पादक सभासद रमेश देशमुख व खातेप्रमुख, विभाग प्रमुख तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















