देशात आज लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या ताज्या ‘मुड ऑफ द नेशन’ जनमत चाचणीनुसार एनडीएला ३२६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. जानेवारी महिन्यातील सर्वेक्षणात एनडीएला ३५२ जागा मिळतील, असा अंदाज होता. त्या तुलनेने आता २६ जागांची घट झाली आहे मात्र २०२४ च्या तुलनेत मतदारांचा विश्वास कायम असल्याचे दिसून येत असून २०२९ च्या निवडणुकांआधी सत्ताधा-यांसमोर तरुणांच्या असंतोषाचे नवे आव्हान उभे राहिले आहे. दुस-या बाजूला, विरोधी ‘इंडिया’ आघाडीला या सर्वेक्षणात १८५ जागा मिळण्याची शक्यता आहे जी जानेवारीच्या अंदाजापेक्षा फारशी वेगळी नाही. पक्षनिहाय आकडेवारीचा विचार केल्यास भाजप आणि काँग्रेसच्या समीकरणांमध्ये लक्षणीय बदल दिसत आहेत. आज निवडणूक झाल्यास भाजपला २६१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ६ महिन्यांपूर्वी वर्तवण्यात आलेल्या २८७ जागांच्या तुलनेत ही मोठी घसरण आहे
त्यामुळे भाजप बहुमताच्या २७२ या जादुई आकड्यापेक्षा थोडा मागे राहताना दिसत असला तरी २०२४ च्या प्रत्यक्ष २४० जागांपेक्षा हा आकडा जास्त आहे. देशभरातील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळामुळे तरुण पिढीमध्ये असलेला संताप भाजपला भोवताना दिसत आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा हा याच नाराजीचा भाग मानला जात आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमकपणे उचलून धरलेल्या मुद्यांचा काँग्रेसला फायदा होताना दिसत आहे. पक्षाला १०६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून जानेवारीतील ८० जागांच्या तुलनेत काँगे्रसने मोठी आघाडी घेतली आहे.
मतांच्या टक्केवारीत दोन्ही आघाड्यांमध्ये तुल्यबळ लढत दिसत आहे. एनडीएच्या मतांची टक्केवारी जानेवारीतील ४७ टक्क्यांवरून घसरून ४५.१ टक्क्यांवर आली आहे. २०२४ च्या प्रत्यक्ष निवडणुकीत एनडीएला ४४ टक्के मते मिळाली होती. विरोधी आघाडीला ३९.१ टक्के मते मिळण्याची शक्यता असून जानेवारीच्या ३९ टक्क्यांच्या तुलनेत यामध्ये किंचित वाढ झाली आहे. या सर्वेक्षणासाठी जुलै ते २५ ऑगस्टदरम्यान २५,१८४ लोकांचे मत जाणून घेण्यात आले तर गेल्या ६ महिन्यांतील ९१,७९५ मुलाखतींचा आधार घेण्यात आला आहे. अलिकडे उदयास आलेल्या कॉक्रोच जनता पक्षामुळे देशातील राजकारण कमालीचे ढवळून निघाले आहे. त्यांनी देशभरातील तरुणाईला एकत्र आणण्याचे मोठे काम केले आहे. त्यातून सरकारविरोधी वातावरण तयार होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. वाढत्या बेरोजगारीच्या समस्येमुळे तरुणाई त्रस्त आहे. त्यांना भविष्यातील अंधार स्पष्टपणे दिसत आहे.
त्याच्याच बरोबरीने काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो’ पदयात्रा ही त्यांच्यासाठी मैलाचा दगड पार करणारी ठरली. ज्याच्या माध्यमातून त्यांनी देशातील धार्मिक द्वेष कमी करत प्रेम व आपुलकीतून माणसांना जोडण्याचे अवघड काम केले तरीही सत्ताधा-यांनी त्यांची ‘पप्पू’ म्हणत टिंगल टवाळी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची राजकीय कोंडी करण्याचाही प्रयत्न झाला; पण ते घाबरले नाहीत. ते न डगमगता संघर्ष करून आजही ठामपणे उभे आहेत. त्यांनी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम सुरू करून तरुणाईच्या भावनेला हात घातला आहे. अख्खी जेन-झी त्यांच्यावर जाम खुश आहे. आपल्या समस्येला वाचा फोडणारा निर्भिड नेता मिळाल्याचा आनंद आणि विश्वास त्यांना मिळाला आहे त्यामुळे सत्ताधारी कमालीचे हादरले आहेत. राहुल गांधींना रोखणे अवघड जाईल या भीतीने सत्ताधा-यांची गाळण उडाली आहे. सत्ताधा-यांविषयीची नाराजी चव्हाट्यावर आणण्याचे काम राहुल गांधींनी केले आहे. कोटा, प्रयागराज, डेहराडून आणि पुणे येथे तरुणाईने राहुल गांधींना दिलेला प्रतिसाद पाहता हे मेळावे प्रचंड यशस्वी झाल्याचे दिसून येते. आता महाराष्ट्रात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या जिल्ह्यातही अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे म्हणे!
















