मुंबई/कोल्हापूर : राज्यभरातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींची मुदत संपली असून तत्कालीन सरपंचांची प्रशासक म्हणून केलेल्या नियुक्तीची मुदतही संपली असल्याने आता ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारीच प्रशासक म्हणून राहणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ पर्यंत ४३३ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश होता. या ठिकाणी सुरुवातीला विस्तार अधिका-यांची आणि त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार तत्कालीन सरपंचांची प्रशासक व सदस्यांची प्रशासक मंडळ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींवर बाराही तालुक्यांतील विस्तार अधिका-यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी घेतलेल्या निर्णयावर ग्रामविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. हाच निर्णय राज्यभर लागू करण्यात आला असून याबाबतची अधिसूचना नुकतीच राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरम्यान, या नियुक्तीच्या आदेशातील दिलेली सहा महिन्यांची मुदत २२ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार नेमका कोणी पाहायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले होते.
शासनाकडून मार्गदर्शन न मिळाल्याने कोल्हापूर पॅटर्न
शासनाकडून मार्गदर्शन न आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी त्यांच्या अधिकारात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांच्याशी चर्चा करून बाराही पंचायत समित्यांमध्ये कार्यरत असणा-या पंचायत, शिक्षण, आरोग्य आणि कृषी विभागाच्या विस्तार अधिका-यांकडे ४३३ ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदाचा कार्यभार दिला होता. हाच निर्णय राज्यभरासाठी लागू झाला.
सहा महिन्यांची मुदत
सहा महिन्यांसाठी विस्तार अधिकारी हे प्रशासक म्हणून राहणार असून त्याआधी जर ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या तर त्यांचे प्रशासकपद संपुष्टात येणार आहे असे अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
















