छत्रपती संभाजीनगर: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनी लाटल्याचा एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातून समोर आला आहे. नाशिकच्या मालेगावमधील एका अट्टल टोळीने एआय टूल्स आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल २० ते २५ कोटी रुपयांची मालमत्ता मूळ मालकाला थांगपत्ता लागू न देता परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हायटेक बनावट दस्तावेज घोटाळ्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या रॅकेटचा बळी ठरलेले अलिअजगर पेटीवाला हे छत्रपती संभाजीनगरच्या हिरापूर (शिरपूर) परिसरातील ५ एकर ११ गुंठे जमिनीचे मालक आहेत. आजच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. भामट्यांनी तब्बल ४० ते ४५ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून या जमिनीचे ‘हिबानामा’ (बक्षीसपत्र) दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करून घेतले. विशेष म्हणजे, या अधिकृत दस्ताऐवजावर अलिअजगर पेटीवाला यांचाच फोटो लावण्यात आला होता.
मात्र, प्रत्यक्षात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पेटीवाला यांच्यासारखाच हुबेहूब दिसणारा चेहरा तयार करून नोंदणी कार्यालयात एक डमी व्यक्ती उभी करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दिवशी हा व्यवहार झाला, त्या दिवशी पीडित पेटीवाला एका नातेवाईकाच्या उपचारासाठी रुग्णालयात होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते चालण्यास असमर्थ होते, परंतु नोंदणी कार्यालयात उपस्थित असलेला ‘डमी’ पेटीवाला मात्र अगदी सहजपणे चालताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे.
हे आंतरजिल्हा रॅकेट अत्यंत संघटित असून ते प्रामुख्याने ज्या जमिनींचे मालक परदेशात आहेत किंवा ज्या मालमत्तेकडे मूळ मालक अनेक वर्षांपासून फिरकले नाहीत, अशा जमिनींना लक्ष्य करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक ठिकाणी अशाच प्रकारे जमिनी लाटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अलिअजगर पेटीवाला यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत जुनेद खान आणि मोहम्मद नूर मोहम्मद हनीफ या दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. या टोळीविरोधात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मिळून आतापर्यंत फसवणुकीचे १६ गुन्हे दाखल झाले असून, पोलीस या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी कसून तपास करत आहेत. एआयच्या अशा गैरवापरामुळे मालमत्ता धारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
















