41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयदिल्ली, कोलकाता मुंबई सर्वांधिक प्रदूषित शहरे

दिल्ली, कोलकाता मुंबई सर्वांधिक प्रदूषित शहरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुंबई तसेच दिल्लीतील वाढलेले हवा प्रदूषण हे मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. देशाची राजधानी दिल्लीत सध्या सगळीकडे विषारी धुक्याचा थर पाहायला मिळत आहे. येथील हवेची गुणवत्ता ही गंभीर श्रेणीमध्ये पोहोचली आहे. दरम्यान, स्विस ग्रुप आयक्यूएआयआरच्या आकडेवारीनुसार देशाची राजधानी दिल्ली, कोलकाता आणि मुंबई ही शहरे आज जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक बनली आहेत.

आज सकाळी ७.३० वाजता नवी दिल्ली पुन्हा ४८३ आयक्यूआयसह या यादीत अव्वल स्थानावर आहे. यानंतर पाकिस्तानातील लाहोर हे शहर ३७१ वर राहिले तर अनुक्रमे २०६ आणि १६२ च्या एक्यूआयसह वायू प्रदूषणाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या ५ शहरांमध्ये कोलकाता आणि मुंबईदेखील आहेत. आज भारतातील दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. दिल्लीतील एक्यूआय ४८३ वर कायम आहे. पाकिस्तानचे लाहोर दुस-या क्रमांकावर आहे, लाहोरचा एक्यूआय ३७१ वर नोंदवला गेला. भारतातील कोलकाता शहर तिस-या क्रमांकावर आहे, जिथे एक्यूआय २०६ आहे.

चौथ्या क्रमांकावर बांगला देशचे ढाका शहर आहे, जिथे एक्यूआय १८९ आहे. यादीत पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचे कराची शहर असून जेथे एक्यूआय १६२ आहे. भारतातील मुंबई शहर यादीत सहाव्या स्थानावर आहे, जिथे त्याचा एक्यूआय १६२ आहे. चीनचे शेनयांग शहर यादीत सातव्या स्थानावर आहे, जेथे एक्यूआय १५९ आहे. चीनचे हांगझोऊ शहर आठव्या क्रमांकावर आहे, त्याचा एक्यूआय १५९ आहे. कुवेत सिटी आठव्या क्रमांकावर आहे, जिथे एक्यूआय १५५ आहे. शेवटी चीनचे वुहान शहर १० व्या क्रमांकावर आहे, जिथे त्याचा एक्यूआय १५२ आहे. कमी तापमान, वा-याचा अभाव आणि शेजारील राज्यांमध्ये शेतातील स्टबल जाळणे यामुळे वायू प्रदूषण वाढल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.

दिल्लीत गंभीर स्थिती
दिल्लीत प्रदूषित हवेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. यांचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्लीच्या केजरीवाल सरकारने राजधानीतील सर्व प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्याचवेळी इयत्ता ६-१२ पर्यंतच्या शाळांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. प्रदूषण पातळी सतत वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. रविवारी सलग सहाव्या दिवशी दिल्लीत विषारी धुके पसरले आणि एअर क्वॉलिटी इंडेक्स (एक्यूआय) गंभीर श्रेणीत पोहोचला.

दिल्लीत डोळ््याच्या जळजळीच्या तक्रारी
नवी दिल्लीच्या २० दशलक्ष रहिवाशांपैकी अनेकांनी डोळे जळजळणे आणि घसा खाजत असल्याची तक्रार आढळत आहे, काही मॉनिटरिंग स्टेशनवर एक्यूआय ५५० वर गेल्याने हवेचा रंगदेखील बदलला आहे. ०-५० चा एक्यूआय चांगला मानला जातो तर ४००-५०० मधील एक्यूआय नागरिकांसाठी धोकादायक मानला जातो.

दिल्लीत बांधकामे रोखली
सूक्ष्म कण ज्यांना पीएम २.५ म्हणून ओळखले जाते. त्याची घनता ५२३ मिलीग्राम प्रतिघनमीटर होती, जी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा १०४.६ पट जास्त आहे. जे मानवी केसांपेक्षा ३० पट पातळ असतात आणि फुफ्फुसातून रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात. वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत बांधकाम थांबवण्यात आले आहे. त्यांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास आणि शक्यतो घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR