नवी दिल्ली : केंद्र सरकारने फ्लेक्स-फ्यूएल वाहनांसाठी ई८५ हे उच्च-इथेनॉल मिश्रित इंधन नियमित पेट्रोलपेक्षा प्रति लिटर २० रुपयांच्या सवलतीत सादर केले आहे. हे इंधन सुरुवातीला निवडक पेट्रोल पंपांवर उपलब्ध असेल आणि त्याचा वापर केवळ फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असलेल्या वाहनांमध्येच करता येईल. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर ई८५ इंधनाचे अनावरण केले. हे इंधन देशभरातील ४८ सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोल पंपांवर विकले जाईल.
हरदीप सिंग पुरी म्हणाले की, डिसेंबर २०२६ पर्यंत ५०० पेट्रोल पंपांवर आणि डिसेंबर २०२७ पर्यंत सुमारे ५,००० पेट्रोल पंपांवर याची उपलब्धता वाढवण्याची सरकारची योजना आहे. ई८५ इंधनामध्ये ८०-८५ टक्के इथेनॉल आणि १४-१९ टक्के पेट्रोल असते. याचा वापर केवळ फ्लेक्स-फ्यूएल वाहनांमध्येच केला जाऊ शकतो, जी ई२० ते ई१०० पर्यंतच्या विविध इंधन मिश्रणांवर चालण्यास सक्षम आहेत. ही वाहने एका प्रगत इंजिन कंट्रोल युनिटने सुसज्ज असतात, जे पेट्रोलमधील इथेनॉलच्या बदलत्या प्रमाणाशी जुळवून घेऊ शकते.
पुरी म्हणाले की, ई८५ पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे २०३०-३१ पर्यंत भारतातील एकूण इथेनॉल मिश्रणाची पातळी अंदाजे २६ टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, देशांतर्गत उत्पादित इथेनॉलचे फायदे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावेत, हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने ई८५ ची किंमत पारंपरिक पेट्रोलपेक्षा प्रति लिटर अंदाजे २० ने कमी निश्चित केली आहे.
इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्याने वाढवले
मंत्री म्हणाले की, भारताने पेट्रोलमधील इथेनॉलचे मिश्रण प्रमाण २०१४ मधील १.५३ टक्क्यांवरून आता २० टक्क्यांपर्यंत वाढवले असून आपले लक्ष्य निर्धारित वेळेच्या पाच वर्षे आधीच साध्य केले आहे. या कार्यक्रमाने १.८४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत केली आहे. कच्च्या तेलाची आयात अंदाजे ३०२ लाख मेट्रिक टनांनी कमी केली आहे.
निम्मी वाहने फ्लेक्स-फ्यूएल तंत्रज्ञानावर आधारित
पारंपरिक पेट्रोल वाहनांच्या तुलनेत ई ८५ वर चालणारी फ्लेक्स-फ्यूएल वाहने हरितगृह वायू उत्सर्जन अंदाजे ६१ टक्क्यांनी कमी करू शकतात. इथेनॉलच्या उच्च ऑक्टेन रेटिंगमुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारते आणि ज्वलन अधिक स्वच्छ होते. ज्यामुळे सूक्ष्म कणांचे उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होते. पुरी म्हणाले की जर भारतात विकल्या जाणा-या सर्व नवीन दुचाकी आणि प्रवासी वाहनांपैकी निम्मी वाहने फ्लेक्स-फ्यूएल तंत्रज्ञानावर आधारित झाली. तर इथेनॉलची वार्षिक मागणी ३.१२ अब्ज लिटरपेक्षा जास्त वाढू शकते. ज्यामुळे शेतक-यांसाठी अंदाजे १२,४०३ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न निर्माण होईल.
कोट्यवधींची बचत होणार
इंधन बदलामुळे दरवर्षी अंदाजे १५,१५१ कोटी रुपयांच्या परकीय चलनात बचत होऊ शकते आणि कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन ६.६४ दशलक्ष मेट्रिक टनांनी कमी होऊ शकते. ब्राझीलशी तुलना करता, जिथे ८० टक्क्यांहून अधिक हलकी वाहने फ्लेक्स-फ्यूएल तंत्रज्ञानावर चालतात, पुरी म्हणाले की भारत प्रायोगिक प्रकल्पांच्या पलीकडे जाऊन एका पद्धतशीर राष्ट्रीय फ्लेक्स-फ्यूएल परिसंस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी इथेनॉल-मिश्रित इंधनाबद्दलची चिंता दूर करण्याचाही प्रयत्न केला.
















