छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारनेही अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार १५ जिल्ह्यांतील २४ तालुक्यांत गंभीर तर १६ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यातच उन्हाळ््याची सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठीही पाणी व चा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने आता चारा छावणीला सुरुवात केली असून मराठवाड्यातील पहिली चारा छावणी गंगापूरमध्ये सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात यंदा सर्वांचाच पाऊस पाण्याचा अंदाज फेल गेला तर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरीही चिंताग्रस्त दिसून आला. पावसाअभावी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने होती होती. विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा ऐरवणीवर होता. त्यानंतर सरकारने ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य शासन निर्णयानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांमध्ये गंभीर तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ४० तालुक्यांमध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत तर जनावरांसाठी चारा छावण्याही सुरू करण्यात येत आहेत. मराठवाड्यातील पहिली चारा छावणी गंगापूरमध्ये सुरू करण्यात आली. इतरत्रही चारा छावण्याची मागणी करण्यात येत आहे.
आमदार बंब यांनी सुरू केली छावणी
दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्याचा प्रवास पुन्हा टँकरवाडा ते चारा छावणीपर्यंत सुरू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे मराठवाड्यातील पहिली चारा छावणी प्रशांत बंब यांनी स्वखर्चाने सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी या चारा छावणीत ७०० जनावरांची नोंद करण्यात आली. शेतक-यांच्या जनावरांना येथे मुबलक चारा, पाणी देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.