लातूर : राज्यात अन्नसुरक्षेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू असताना, अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत धडक कारवायांचा वेग वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातही FDA ने मोठी कारवाई करत रेणापूर येथील महात्मा गांधी चौकातील प्रसिद्ध बेंगलोर अय्यंगर्स बेकरीवर धाड टाकली. या कारवाईत बेकरीमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थांची निर्मिती होत असल्याचे तसेच मुदतबाह्य कच्चा माल वापरला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
FDA च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत बेकरीच्या स्वयंपाकघरात अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. अस्वच्छ परिसर, निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर आणि कालबाह्य कच्चा माल यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदवला. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता संबंधित बेकरीचा अन्न व्यवसाय परवाना (Food Licence) जागेवरच रद्द करण्यात आला आणि बेकरीचा व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
कारवाईदरम्यान बेकरीत विविध कंपन्यांचे व्हाईट कंपाउंड चॉकलेट आणि ब्रेड पावडरचा एकूण 3,039 रुपयांचा मुदतबाह्य साठा जप्त करण्यात आला. हा संपूर्ण साठा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेवरच नष्ट करण्यात आला. याशिवाय मिठाई तयार करण्यासाठी साठवून ठेवलेला 10 किलो खवा, ज्याची अंदाजे किंमत 2,700 रुपये होती, तोही अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अयोग्य असल्याने तात्काळ नष्ट करण्यात आला.
FDA अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला आहे. खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी स्वच्छता, गुणवत्तेचे निकष आणि अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई मानली जात असून, या घटनेमुळे जिल्ह्यातील बेकरी, हॉटेल्स, मिठाई दुकाने आणि इतर खाद्य व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात जिल्हाभरात अशाच प्रकारच्या अचानक तपासण्या आणि धडक मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
















