नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ : केरळमध्ये ३ दिवसांच्या विलंबाने दाखल झाल्यानंतर मान्सूनने वेग पकडला आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडूच्या संपूर्ण किनारपट्टी भागातून पुढे सरकत मान्सून योग्य वेळी गोव्यात पोहोचला. येथे मान्सून दाखल होण्याची सामान्य तारीख ५ जून होती.
मान्सून मुंबईत वेळेवर किंवा त्यापूर्वी दाखल होऊ शकतो अशी अपेक्षा आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून ईशान्येकडील राज्यांसह पश्चिम बंगालच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकतो. १० दिवसांच्या आत बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तथापि, नंतर मान्सून अडकू शकतो. स्कायमेट वेदरचे हवामान तज्ज्ञ जीपी शर्मा यांनी सांगितले की पूर्व आणि मध्य भारतात मान्सून पुढे नेण्यासाठी बंगालच्या उपसागरात एका मजबूत हवामान प्रणालीची आवश्यकता असते ज्याचे संकेत सध्या नाहीत. अशा परिस्थितीत मध्य प्रदेश, छत्तीसगड व्यतिरिक्त, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या उर्वरित भागांमध्ये मान्सूनचा वेग मंदावू शकतो.
सध्या, गुजरात वगळता इतर सर्व राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. राजस्थानमध्ये शुक्रवारी धूळ आणि वादळी वा-यासह झालेल्या जोरदार पावसामुळे चार लोकांचा मृत्यू झाला.
मान्सूनवर तज्ज्ञांचे मत
मान्सून केरळच्या किना-यापासून सुमारे ३५ किमी दूर समुद्रात १२ दिवस अडकून राहिला होता. तरीही, हवामान विभागाच्या मते, ४ जून रोजी केरळमध्ये पोहोचणे सामान्य मानले जाईल, जरी ते सरासरी तारखेपेक्षा ३ दिवस उशिरा आले असले तरी.
हवामान विभागाच्या मते, ५ जूनपर्यंत देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा १४% कमी नोंदवला गेला. तरीही, गेल्या ४ दिवसांत परिस्थितीत वेगाने सुधारणा झाली आहे. पावसाची कमतरता ४०% वरून १४% पर्यंत कमी झाली आहे.
पुढील २-३ दिवसांत मान्सून ईशान्येकडील राज्यांसह पश्चिम बंगालच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकतो. तर, १० दिवसांच्या आत बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.
















