नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडे तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये ३० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला असतानाच राष्ट्रीय गुन्हा नोंदणी विभागाने (एनसीआरबी) भयावह आकडेवारी दिली असून देशात दिवसाला ८६ बलात्कार होत असल्याचे उघड झाले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील महिलांवरील अत्याचाराची स्थिती अत्यंत भयावह आहे. देशात गेल्या एका दशकाहून अधिक काळ दरवर्षी ३० हजारांहून जास्त बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद होत आहे. २०२४ मध्ये देशात २९ हजार ५३६ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२१ च्या एनसीआरबीच्या अहवालानुसार, देशात वर्षभरात ३१ हजार ६७७ गुन्हे नोंदवले गेले आहेत. याचाच अर्थ देशात दररोज सरासरी ८६ बलात्काराच्या घटना घडत आहेत. २०१६ मध्ये देशात सर्वाधिक म्हणजेच तब्बल ३९ हजार बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. २०१८ मध्ये ३३ हजार ३५६ गुन्हे नोंदवले गेले. याचा अर्थ दर १६ मिनिटाला एका स्त्रीवर अत्याचार होत असल्याचे दिसून आले. तसेच या आकडेवारीतील सर्वांत धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव म्हणजे देशात होणा-या एकूण बलात्कारांपैकी तब्बल ८९ टक्के गुन्हे हे पीडित महिलेच्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच केले जातात. यामध्ये पती, नातेवाईक, शेजारी आणि सोबत काम करणारे सहकारी यांचा समावेश आहे.
शिक्षा होण्याचा दर २८ टक्के
२०१८ ते २०२२ दरम्यान देशात बलात्काराच्या खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचा दर केवळ २७ ते २८ टक्के इतकाच मर्यादित आहे. ब्रिटनमध्ये हे प्रमाण ६० टक्के पेक्षा जास्त आहे. तसेच २०१७ ते २०२२ दरम्यान न्यायालयांसमोर आलेल्या २.७६ लाख खटल्यांपैकी केवळ एक तृतीयांश खटल्यांचा निकाल लागू शकला. उर्वरित खटले वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. २०२२ च्या युएन ुमन राईट्स कौन्सिलच्या अहवालानुसार दलित महिलांच्या बाबतीत तर शिक्षेचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
अनोळखी व्यक्तीकडून अत्याचाराचे प्रमाण कमी
पीडित महिलांवर अत्याचार करणा-यांमध्ये सर्वाधिक प्रमाण ओळखीच्या व्यक्तींचे असते. अनोळखी व्यक्तींकडून होणा-या बलात्कारांचे प्रमाण या तुलनेत खूप कमी (साधारण १०% ते १४%) असते. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी हे कुटुंबातील सदस्य, दूरचे नातेवाईक किंवा जवळचे मित्र असतात, ज्यांच्यावर पीडितेचा विश्वास असतो. देशात दररोज सरासरी ८६ हून अधिक बलात्काराच्या घटनांची नोंद होते आणि यातील बहुतांश गुन्हेगार पीडितेच्या विश्वासाला पात्र ठरलेले असतात.
















