मुंबई (प्रतिनिधी) : पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी महविकास आघाडी व महायुतीतील जागावाटपाचा गुंता काही सुटलेला नाही. मुंबईत मार्ग निघत नसल्याने महायुतीतला वाद आता दिल्लीत पोहोचला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे रात्री उशिरा महाराष्ट्रातील पेच सोडवण्यासाठी बैठक होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल दिल्लीला रवाना झाले आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष आधीच दिल्लीत पोहोचले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली – चिमूर, भंडारा – गोंदिया व रामटेक या ५ मतदारसंघांत १९ एप्रिलला निवडणूक होणार आहे. तेथे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून बुधवार २७ तारखेपर्यंत ही मुदत आहे मात्र अजूनही महाविकास आघाडी व महायुतीतील जागावाटपाचा गोंधळ संपलेला नाही. महाविकास आघाडीत सांगलीसह ५ जागांचा वाद कायम आहे तर महायुतीत दक्षिण मुंबई, नाशिक, धाराशिव, भिवंडी, संभाजीनगर आदी मतदारसंघांचा वाद आहे. आपण सांगू ते एकनाथ शिंदे व अजित पवार मान्य करतील, असे भाजपाला वाटत होते; पण या दोघांनीही काही जागांसाठी ताणून धरल्याने गुंता सुटू शकलेला नाही. अखेर आता दिल्लीत अमित शाह यांच्याकडे अंतिम बैठक होणार आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसने सांगलीच्या जागेसाठी आग्रह धरला आहे तर उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे तणाव वाढला आहे. हा वादही दिल्ली दरबारी गेला आहे.