न्यूयॉर्क : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात हद्दपारी मोहीम सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यात अमेरिकेतील १८ हजार अनडॉक्युमेंटेड (दस्तऐवज नसलेले) भारतीय निशाण्यावर आले आहेत.
यावेळीही ट्रम्प प्रशासन हद्दपारीसाठी लष्करी विमानांचा वापर करण्याच्या तयारीत आहे, जी त्यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणाची सर्वात चर्चित प्रतिमा बनली आहे. अनडॉक्युमेंटेड भारतीयांना अपील, युक्तिवाद किंवा वकील लावण्याचीही संधी मिळणार नाही. ट्रम्प यांच्या आयसीई (इमिग्रेशन कस्टम्स अँड एनफोर्समेंट) च्या टीम्स या प्रकरणी सतत छापेमारी करत आहेत. अमेरिकेतील ४ शहरांमधून न्यूयॉर्क, टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यूजर्सी ग्राउंड रिपोर्ट आला असून यात समोर आले की, हद्दपारी मोहिमेने दस्तऐवज नसलेल्या भारतीयांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे.
डिटेंशन सेंटरमध्ये बंद असलेल्या लोकांसोबत गैरवर्तनाच्या गोष्टीही समोर आल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने डिपोर्ट केल्या जाणा-या स्थलांतरितांना ठेवण्यासाठी एल पासोमध्ये एक आणि कॅलिफोर्नियामध्ये दोन वेअरहाऊस खरेदी केले आहेत. यावर सुमारे १६५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या वेअरहाऊसना डिटेंशन सेंटरमध्ये रूपांतरित करून कउए कडे सोपवण्यात आले आहे. येथे सुमारे १२ हजार स्थलांतरितांना ठेवण्यात येत आहे.
आता थेट डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले जाते
न्यूयॉर्कचे इमिग्रेशन अटॉर्नी ग्रेग सिस्किंड म्हणतात, मी ३० वर्षांपासून स्थलांतरितांचे खटले लढत आहे. दस्तऐवज नसलेल्या कोणत्याही स्थलांतरिताला आपली बाजू मांडण्याची संधी मिळते, पण आता आयसीईच्या छाप्यांनंतर लोकांना थेट डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेतील संघीय व्यवस्थेमुळे प्रत्येक राज्यात मानवाधिकारांशी संबंधित वेगवेगळे कायदे आहेत, परंतु आयसीई कोणत्याही राज्यात जाऊन कारवाई करत आहे.
गतवर्षी ३,५६७ भारतीय हद्दपार
२०२५ मध्ये अमेरिकेने ३,५६७ भारतीय नागरिकांना परत पाठवले होते (डिपोर्ट केले होते). ही माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जून २०२६ मध्ये दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की २०२६ मध्ये जूनपर्यंत १,०७६ भारतीयांना परत पाठवण्यात आले आहे. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेने पहिल्यांदाच लष्करी विमानाने १०४ भारतीयांना अमृतसरला पाठवले होते. यावेळी अनेक लोकांना हातकड्या आणि पायात बेड्या घालण्यात आल्या होत्या. याची छायाचित्रे समोर आल्यानंतर देशभरात वाद निर्माण झाला. संसदेतही गदारोळ झाला होता.
















