लातूर : प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगीतील कथित अपहार व भ्रष्टाचार प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस आणि लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज दि. ७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता शहरातील गंज गोलाई येथे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह करण्यात येणार आहे.
राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाने देशभरातील भाविकांकडून गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या अपहाराच्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकाराचा निषेध करण्यासाठी लातूरमध्ये काँग्रेस पक्षाकडून अभिनव मार्गाने आंदोलन केले जाणार आहे. या सत्याग्रहाची सुरुवात लातूरचे ग्रामदैवत असलेल्या गंजगोलाई परिसरातील आई जगदंबेच्या चरणी महाआरती अर्पण करून होईल. त्यानंतर भजन व ‘रघुपती राघव राजाराम’ या रामधूनने सत्याग्रह करत संबंधित अपहार प्रकरणाचा जाहीर निषेध केला जाईल.
भाविकांच्या श्रद्धेशी खेळणा-या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहात लातूर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे व सेलचे प्रमुख, कार्यकर्ते तसेच लातूरच्या सर्वसामान्य नागरिकांनी सकाळी १०.३० वाजता गंज गोलाई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके व लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळेकर यांनी या संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
















