मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाकित
नागपूर : प्रतिनिधी
रामदेवबाबा विद्यापीठ येथे आज एआय लॅबचे उद्घाटन होत आहे, याचा मला फार आनंद आहे. बनवारीलाल पुरोहित यांनी रामदेवबाबा विद्यापीठाची स्थापना केली. त्यासोबत विदर्भ आणि देशात अग्रणी संस्था म्हणून त्यांनी कार्य केले. खाजगी संस्था असतानाही देशातील चांगली संस्था म्हणून रामदेव बाबा विद्यापीठाकडे पाहिले जाते. येथे केवळ शिक्षण नाही तर संशोधनाला बळ दिलं, त्यामुळे हे विद्यापीठ लवकरच देशातील महत्त्वाच्या विद्यापीठात समाविष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तज्ज्ञांच्या मते किमान ७० टक्के रोजगाराचे स्वरूप येणा-या दिवसात एआयमुळे बदलेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूरच्या रामदेव बाबा अभिमत विद्यापीठात विकसित करण्यात आलेल्या अद्ययावत एआय लॅब तसेच सुपर कम्प्युटरच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. एआय हे भविष्य आहे. आमच्या शिक्षणसंस्थांनी संशोधन करण्याची हीच योग्य वेळ आहे. रोबोटिक्स, बायो टेक्नॉलॉजी आणि इतर सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानांमुळे बदल होत आहे. तसेच एआय तीव्रतेने सर्व काही बदलत आहे. एआय क्षेत्रातील एका अत्यंत मोठ्या तज्ज्ञ व्यक्तीने मला सांगितले की, येणा-या काळात रोजगाराचे स्वरूप बदलेल. किमान ७० टक्के रोजगाराचे स्वरूप येणा-या दिवसांत एआयमुळे बदलेल. रोजगार जाणार नाही. मात्र, त्याचे स्वरूप बदलेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एआयद्वारे शेतक-यांना
अचूक सल्ला मिळतो
महाराष्ट्रात सरकारने महाविस्तार नावाचे एआय पॉवर्ड अॅप विकसित केले. त्याद्वारे महाराष्ट्राचे शेतकरी त्यांच्या स्थानिक बोली भाषेत तज्ज्ञांशी संवाद साधून समस्या आणि त्यावरील उपाय विचारू शकतात. पिकांच्या एका फोटोद्वारे शेतक-याला अचूक सल्ला आणि सूचना मिळू शकते. ही एआयची कमाल आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
















