लातूर : प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील मनरेगा योजनेतील कथित भ्रष्टाचार, प्रलंबित देयके, पिक विमा व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर हे शेतक-यांसह सोमवार दि. २० जुलै पासून चाकूर येथील जुने बसस्थानकासमोरील कमानीजवळ आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती बालाजी पाटील चाकूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चाकूर तालुक्यातील शेतक-यांच्या विविध प्रश्नांबाबत वेळोवेळी शासन व प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतक-यांना न्याय मिळावा आणि संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे चाकूरकर यांनी सांगितले.
चाकूर, अहमदपूर व शिरूर अनंतपाळसह राज्यातील नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील शेतक-यांनाही मनरेगा योजनेचा लाभ लागू करण्यात यावा. चाकूर, अहमदपूर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतक-यांचा २०२५-२६ चा पिक विमा तात्काळ मंजूर करून वितरित करण्यात यावा. विहीर, गोठे, घरकुल आदी कामे पूर्ण करूनही प्रलंबित असलेली सर्व बिले तातडीने अदा करण्यात यावीत. अशा मागण्या त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत. या पत्रकार परिषदेला अविनाश जाधव, मुरलीधर माने, गोविंद गवळी, पंढरी हादवे, सुरेश कांबळे, तुकाराम कोरके, राम कांबळे आदी उपस्थित होते.
















