पुणे : प्रतिनिधी
नोकरी जाण्याची सततची भीती, मध्यमवयीन कर्मचा-यांवरील वाढता दबाव, सरकारी संरक्षणाचा अभाव आणि संशोधन-नवकल्पनांवरील अपुरी तजवीज या प्रमुख आव्हानांचा सामना करणारे ‘आयटी’ क्षेत्र सध्या संकटात असल्याचे चित्र आहे. पुण्यालगतच्या हिंजवडी परिसरातील आयटीयन्स सध्या या ताण-तणावांना सामोरे जात आहेत.
अनुभवी कर्मचा-यांच्या जागी कमी पगारातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याने ३० ते ४५ वर्षे वयोगट सर्वाधिक असुरक्षित ठरत आहे. अनेकांना सक्तीने राजीनामा द्यावा लागतो, तर काही जणांना नव्या नोकरीसाठी महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.
कर्मचारी कपातीदरम्यान पारदर्शकता, नोकरी संपल्याची भरपाई आणि बेरोजगारी भत्ता अशा संरक्षणात्मक व्यवस्थांचा अभाव असल्याने आयटी कर्मचा-यांना कोणताही आधार मिळत नाही. काही कंपन्यांकडून कर्मचा-यांच्या पार्श्वभूमी तपासणीबाबत भीती दाखविली जात आहे. त्यामुळे आयटी कर्मचा-यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे.
बहुतांश आयटी कंपन्या आउटसोर्सिंग, कॉस्ट कटिंग आणि शॉर्ट-टर्म बिलिंग मॉडेलवर चालत असल्याने एआय, सायबर सिक्युरिटी, सेमीकंडक्टर व रोबोटिक्ससारख्या क्षेत्रात मागे पडत आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी मजबूत कामगार संरक्षण कायदे, देशव्यापी कौशल्यवृद्धी मोहीम, संशोधन-नवकल्पनांना मोठा निधी आणि मध्यमवयीन कर्मचा-यांसाठी दुस-या करिअरच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे मत आयटीयन्सकडून व्यक्त केले जात आहे.
















