भाविकांच्या दर्शनाची होणार सोय, अधिकारी, कर्मचा-यांनी समन्वय
ठेवून उत्कृष्ट काम करावे, पालकमंत्र्यांच्या सूचना
पंढरपूर : तालुका प्रतिनिधी
आषाढी शुद्ध एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी, भाविक येतात. त्यांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षीच्या आषाढीवारीतही दर्शन कमी वेळेत व सुलभपणे व्हावे, यासाठी १० जुलै २०२६ पासून व्हीआयपी दर्शन बंद तसेच मंदिर परिसरात नो व्हेईकल झोन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली केबीपी कॉलेजच्या सभागृहात आज बैठक आयोजित करण्यात आले होती, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक अभिजीत औटी, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहआयुक्त नगरपालिका आशिष लोकरे, अन्न धान्य पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, मागील वर्षी व्हीआयपी दर्शन बंद केल्याने वारकरी भाविक यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा वेळ किमान पाच ते सहा तास कमी झाला. तसेच मंदिर परिसरात नो व्हेईकल झोन लागू केल्याने भाविकांना मंदिराला प्रदक्षिणा घालणे तसेच दर्शन घेऊन बाहेर पडणे सुलभ झाले होते. तसेच पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले होते. त्यामुळे यावर्षीही १० जुलैपासून प्रशासनाने या दोन्ही बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
स्वच्छतेला प्राधान्य द्या
प्रशासनाने यावर्षीच्या वारीतही स्वच्छतेला सर्वोत्तम प्राधान्य द्यावे. नागरी भागात नगरपरिषद तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने वारीच्या अगोदर आठ दिवसापासून स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी. पंढरपूर शहर, वाखरी पालखी तळ, ६५ एकर आणि वाळवंट या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालये तसेच तात्पुरत्या शौचालयाची स्वच्छता व्यवस्थित करावी. महिला स्रानगृहे, हिरकणी कक्ष निर्माण करून त्यात आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच पंढरपूर शहर तसेच उपरोक्त सर्व ठिकाणी कोठेही कचरा पडणार नाही यासाठी पुरेसे साफसफाईचे कर्मचारी नियुक्त करावेत, अशा सूचना पालकमंत्री गोरे यांनी दिल्या.
वारकरी सेवा केंद्रात
सर्व सुविधा द्याव्यात
मुख्यमंत्री आरोग्य रथ (मेडिकल ऑन व्हील) तसेच मुख्यमंत्री वारकरी सेवा सुविधा केंद्रात वारकरी भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांनी वाखरी ते केबीपी कॉलेजपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करावीत व स्वच्छता करून घ्यावी, डिव्हायडरच्या मध्यभागी वृक्षारोपण करून घेणे, लाइटिंगची व्यवस्था करावी, अशा सूचना गोरे यांनी केल्या.
















