२६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा, धरणात आवक वाढली
उजनी धरण : सिद्धेश्वर शिंदे
भीमा नदीच्या वरच्या खो-यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून धरण सध्या ५० टक्के भरले आहे. धरणात २६ टीएमसी उपयुक्त (जिवंत) पाणीसाठा उपलब्ध झाला असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, शेती आणि उद्योगांसाठी दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांत दौंड बंधा-यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने उजनी धरणात मोठी आवक झाली. त्यातून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. मात्र, सध्या विसर्ग कमी झाल्याने पाण्याची पातळी ५० टक्क्यांच्या आसपास स्थिरावली आहे. सध्या धरणात एकूण ४८.७५ टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी २६.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. भीमा खो-यात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास धरणातील साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उजनी धरण परिसरात केवळ ८८ मिमी पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच कालावधीत २८१ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे स्थानिक पावसापेक्षा भीमा खो-यातील पावसावरच उजनीच्या जलसाठ्याचे भवितव्य अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दमदार पावसाची आवश्यकता
गेल्या सहा वर्षांत उजनी धरणाने विविध तारखांना ५० टक्के पाणीसाठा गाठला होता. यंदाही जुलैच्या सुरुवातीलाच हा टप्पा गाठल्याने समाधान व्यक्त होत असले तरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी वरच्या खो-यात सातत्याने चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.
















