नांदेड : निळकंठ वरळे
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत ११ लाख १६ हजार ६३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अटीतटीच्या सामन्यात कोण बाजी मारेल याची उत्सुकता शिंगेला लागली आहे. नांदेड का कोण बनेगा खासदार या चर्चेला उधान आले आहे. कार्यकर्त्यांमध्ये सट्टे बाजार वाढला असून शहरासह गावागावात चर्चेला उधान आले आहे. ६० टक्के मतदान झाल्यामुळे विजय कोणाचा होणार त्या दृष्टीने अकडेमोड सुरु आहे. पैजा लागत आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता शहरासह जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाचा टक्क वाढावायासाठी जिल्हाप्रशासनाने विविध उपक्रम राबविले. मात्र टक्केवारी गत निवडणुकीपैक्षा कमी झाली. अपेक्षीत असलेली टक्केवारी त्याप्रमाणात मतदान झाले नाही. गणिते जुळविण्यासाठी अनेकांनी अकडेमोड सुरु केली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे मोठ्या मताधिक्यांनी भाजपाचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर निवडणुन येतील अशी आशा अनेकांनी व्यक्त केली होती. प्रचारही त्याप्रमाणे जोरदार झाला. मात्र काँग्रेस आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनीही अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान घेतले असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलल्या जात आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनीही जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरात प्रचार जोरात केला. मतदारही त्यांच्या बाजूने कौल कांही भागामध्ये दिसून आला आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारांनी जास्तीचे मत घेतली तर याचा फायदा भाजपाच्या उमेदवारास होईल असे भाकीत तज्ञांनी व्यक्त केले आहे. तर काँग्रेसचे मतदान कमी होवून भाजपच्या उमेदवाराला याचा फायदा होईल असे बोलल्या जात आहे. भाजपच्या उमेदवारासाठी मतदार संघात प्रधामंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सभा झाल्या आहेत. तर काँग्रसेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खरगे, माजी मंत्री अमित देशमुख, आ. धिरज देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा झाल्या आहेत.
तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ वंचितचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर याच्यासह अनेक नेत्यांनी सभा घेतल्या. मतदान शांततेत पार पडल्यानंतर निकालाची उत्सुकता सिगेला लागली आहे. अत्ता प्रतिक्षा ४ जूनची आहे. नांदेड लोकसभा मतदार संघात मराठा समाजाचे मते विजयासाठी निर्णयाक ठरणार आहे. जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा समाजाने त्याप्रमाणे मतदानातून कौल दिल्याचे समजते. मात्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. भाजपा व काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना दिसून येत आहे. यात कोण बाजी मारेल हे मात्र मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. कार्यकर्त्यांमध्ये मात्र जोरदार अकडेमोड सुरु आहे. मोठ्या प्रमाणात पैजा लागत आहेत. गावागावात एकच चर्चा नांदेड का खासदार कोण बनेगा! उत्सुकता शिंगेला लागली आहे.