नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगलादेशमधील हिंदू, अल्पसंख्याकावरील हिंसाचाराचे पडसाद भारतामध्ये उमटत असून बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.
बांगलादेशातील हिंदूंसाठी भारतामध्ये आवाज उठवला जात आहे. विश्व हिंदू परिषदेने २३ डिसेंबर रोजी दिल्लीत निदर्शने केली. बांगलादेशमध्ये अलिकडेच झालेल्या हिंदू तरुण दीपू चंद्राच्या हत्येमुळे दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर तणाव निर्माण झाला आहे. निदर्शकांनी बांगलादेश उच्चायुक्तालयासमोरील बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. आक्रमक तरुणांची दिल्ली पोलिसांशी झटापट देखील झाली.
आज (दि.२३) सकाळी ११ वाजल्यापासून, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बांगलादेशमधील हिंदू पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर जमले आहेत. दरम्यान, बांगलादेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या, विशेषत: वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढत आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या काही वेळ आधी बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. या बैठकीला भारताचे उपउच्चायुक्तही उपस्थित होते. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव असद अल-सियाम यांनी उच्चायुक्तांना बोलावले. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतातील विविध भागातील बांगलादेश मिशनभ ोवती वाढत्या सुरक्षा चिंतेमुळे वर्मा यांना बोलावण्यात आले. त्यांना भारतातील सर्व बांगलादेश मिशनची सुरक्षा अधिक मजबूत करण्यास सांगण्यात आले.

