मुंबई : वृत्तसंस्था
आयआयटी मुंबई आणि एनटीपीसी लि. यांनी संयुक्तपणे देशातील पहिली कार्बन डायऑक्साइड साठवणूक चाचणी विहीर यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
आयआयटी मुंबई पृथ्वी विज्ञान विभागाने एकत्र येत देशातील प्रमुख कोळसाक्षेत्रांमध्ये कार्बन साठवणुकीची शक्यता तपासली. या अभ्यासातून चार मोठ्या कोळसाक्षेत्रांचा सविस्तर आढावा घेत पहिल्यांदाच भूवैज्ञानिक साठवण नकाशा तयार करण्यात आला. त्यानंतर झारखंडमधील उत्तर करनपुरा कोळसाक्षेत्रातील पाकरीबरवाडी परिसरात देशातील पहिली चाचणी विहीर खोदण्यास सुरुवात झाली.
सुमारे १ हजार २०० मीटर खोलीपर्यंत नेण्यात आलेली ही विहीर १५ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली आहे. याच ठिकाणी दुस-या विहिरीचे कामही सुरू झाले असून, या दोन्ही विहिरींच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साइड सुरक्षितपणे जमिनीत साठवता येतो का, याची प्रत्यक्ष चाचणी होणार आहे. हा प्रकल्प निती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. एनटीपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गुरुदीप सिंग यांनी हा टप्पा ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी संशोधन प्रत्यक्ष क्षेत्रात उतरल्याने भारताच्या ऊर्जा संक्रमण प्रक्रियेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रकल्पप्रमुख विक्रम विशाल यांनी हा उपक्रम केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट केले.
















