वलांडी : हसन मोमीन
लातूर जिल्ह्यातील निलंगा, देवणी व उदगीर या तीन तालुक्यांसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील दळणवळण अधिक गतिमान करणारा शिरोळ-शेकापूर जोडरस्ता तातडीने विकसित करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, वाहनधारक आणि भाविकांकडून होत आहे. सुमारे २९ किलोमीटर लांबीचा हा जोडमार्ग पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील महत्त्वाचा पर्यायी संपर्कमार्ग म्हणून त्याची ओळख निर्माण होणार असून वाहतूक, पर्यटन आणि ग्रामीण विकासास मोठी चालना मिळणार आहे.
सध्या निलंगा तालुक्यातील शिरोळ-वांजरवाडापर्यंत राज्य मार्ग उपलब्ध आहे मात्र त्यापुढील जवळगा-वाघनाळवाडी-सय्यदपूर (ता. देवणी) मार्गे हत्तीबेट-देवर्जन-शेकापूर (ता. उदगीर) हा मार्ग अद्याप पूर्णपणे विकसित झालेला नाही. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास निलंगा, देवणी आणि उदगीर या तीन तालुक्यांतील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. या जोडमार्गाचे विशेष महत्त्व म्हणजे जहिराबाद-लातूर राज्य मार्ग, प्रस्तावित गुलबर्गा-नांदेड राज्य मार्ग आणि आष्टामोड-उदगीर-निजामाबाद राज्य मार्ग हे तीन प्रमुख मार्ग परस्पर जोडले जाणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशकडे जाणा-या वाहतुकीस पर्यायी आणि कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होईल. व्यापारी वाहतूक, कृषी मालाची ने-आण, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन प्रवासासाठीही या मार्गाचा मोठा लाभ होणार आहे.
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गावर उदगीर तालुक्यातील अ वर्ग तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ हत्तीबेट, शंभू उंबरगा येथील महादेव मंदिर, निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील हनुमान मंदिर, निळकंठेश्वर देवस्थान (निलंगा), शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कान्हेश्वर देवस्थान, तसेच देवणी तालुक्यातील मांजरा नदीकाठी वसलेले श्री रामलिंगेश्वर देवस्थान (जवळगा) अशी अनेक प्रसद्धि धार्मिक स्थळे आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्यास ही सर्व तीर्थस्थळे एकमेकांशी सुलभपणे जोडली जातील आणि भाविक व पर्यटकांना कमी वेळेत दर्शनाचा लाभ घेणे शक्य होईल.
या मार्गामुळे लातूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार असून इंधनाची बचत, प्रवासाचा खर्च कमी होणे, वाहतुकीवरील ताण कमी होणे आणि ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक व व्यापारी व्यवहारांना गती मिळणे अपेक्षित आहे. सीमाभागातील गावांच्या विकासालाही या रस्त्यामुळे नवी संधी उपलब्ध होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे. परिसरातील ग्रामस्थांनी या रस्त्यास प्राधान्याने प्रशासकीय मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करावा. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सर्वेक्षण करून काम हाती घ्यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
















