परिवहन मंत्र्यांची माहिती, आषाढी यात्रेसाठी ५,५०० एसटी बस सज्ज
पंढरपूर / प्रतिनिधी
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणा-या लाखो वारक-यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने यंदा ५,५०० एसटी बस गाड्यांची व्यवस्था केली असून सुमारे ४ ते ५ हजार अधिकारी व कर्मचारी सेवेत तैनात करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक प्रभावी नियोजन करण्यात आले असून वारक-यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, अशी ग्वाही एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.
आषाढी यात्रेच्या नियोजनासंबंधी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन पंढरपूर येथील चंद्रभागा बस स्थानक येथे करण्यात आले होते. एसटी महामंडळाच्या नियोजन बैठकीनंतर मंत्री सरनाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरनाईक म्हणाले की, गेल्या वर्षी यात्रेदरम्यान उत्पन्नापेक्षा वारक-यांना चांगली सेवा देण्यावर भर देण्यात आला होता. त्याला मोठे यश मिळाल्याने यंदा प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून ५,५०० एसटी बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याशिवाय ४० वारकरी एकत्र आल्यास त्यांना पूर्ण बस भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची विशेष योजना सुरू करण्यात आली असून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पंढरपूरच्या जुन्या अकलूज रस्त्यावर आणि चंद्रभागा बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीमुळे एसटी बाहेर पडण्यासाठी अनेकदा चार तासांपर्यंत विलंब होत असल्याची बाब अधिका-यांनी निदर्शनास आणून दिली. यावर पोलिस प्रशासन व स्थानिक अधिका-यांशी चर्चा करून दोन दिवसांत योग्य उपाययोजना करण्यात येईल, असे सरनाईक यांनी सांगितले. दिंड्यांच्या मार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी आरटीओ अधिका-यांशी चर्चा करून आवश्यक ती उपाययोजना केली जाईल. प्रवाशांच्या जीवापेक्षा कोणताही पक्ष किंवा कार्यकर्ता मोठा नसून वारक-यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
कर्मचा-यांचा सत्कार करणार
यात्रेदरम्यान दिवस-रात्र सेवा देणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे काम केवळ करून घेणे योग्य नाही. उत्कृष्ट सेवा देणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा विशेष कार्यक्रमात सन्मान करून त्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
पंढरपूर बसस्थानकाचा
पीपीपी तत्वावर विकास
पंढरपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकाचा पीपीपी तत्त्वावर विकास करून आधुनिक बसपोर्ट उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. बसस्थानकाच्या जागेचा व्यावसायिक वापर करून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असून पुढील पाच ते सहा महिन्यांत या कामाला गती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यात्रा काळात शटल बससेवा
महाराष्ट्रातून मोफत एसटीने येणा-या वारक-यांना शहराबाहेरील बसस्थानकांवर उतरल्यावर रिक्षाचालकांकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या प्रश्नावर सरनाईक म्हणाले की, भाविकांनी शक्यतो एसटी बसचाच वापर करावा. बसस्थानकांपासून शहरात येण्यासाठी शटल बससेवा सुरू करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या.
















